मुंबई : मुंबईच्या दिशेने येणारे एअर इंडियाचे विमान सोमवारी २१ जुलैला सकाळी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँन्डिंगच्या वेळी धावपट्टीवरून बाहेर सरकल्याची घटना घडली. सतत पडणाऱ्या पावसामुळे धावपट्टीवर पाणी साचल्याने विमान उतरतेवेळी धावपट्टीच्या बाहेर गेले.
ही घटना सकाळी ९:२७ वाजता घडली. एअर इंडियाचे AI–2744, Airbus A320neo या विमानाचे तीन टायर्स फुटल्याचे माहिती आहे. त्यामुळे धावपट्टीवर थोडेफार नुकसान झाले आहे. विमानतळ प्रशासनाने प्राथमिक तपासानंतर संपर्क रनवे ०९/२७ बंद केला, परंतु उड्डाण आणि लँडिंगवर परिणाम टाळण्यासाठी सेकंडरी रनवे १४/३२ सुरू केला. एअर इंडियाकडून सांगण्यात आले आहे की, विमान सुरक्षित आहे. सर्व प्रवासी आणि क्रू सुरक्षितरित्या उतरले आहेत आणि विमान तात्पुरते ग्राउंड करण्यात आले आहे.
मुंबईमध्ये सकाळपासूनच जोरदार पाऊस पडतो आहे. उपनगरांमध्ये ११५ मिमी आणि कुलाबामध्ये ११ मिमी पावसाची नोंद झाली. यामुळे धावपट्टीवरील पृष्ठभाग पाण्याने ओथंबला होता, ज्याने विमानाच्या उतरण्यावर परिणाम केला असण्याची शक्यता आहे. डीजीसीए आणि विमानतळ प्रशासन यांनी संयुक्तपणे तपासणी सुरू केली आहे. ते घटनास्थळी ताबडतोब उपस्थित झाले आहेत आणि हवामान, धावपट्टीवरील पाण्याची अवस्था, टायर्स फुटण्याचे कारण याचा अभ्यास करत आहेत.