"भारत आपल्याविरुद्ध षड्यंत्र रचतोय"; मोहम्मद युनूस पुन्हा बरळले

    26-May-2025   
Total Views |

mohammed yunus says india trying to destroy bangladesh amid crisis with army
 
ढाका : (Mohammed Yunus) सध्या बांग्लादेशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. अंतरिम सरकार प्रमुख मोहम्मद युनूस यांना विरोधी पक्ष आणि लष्कराच्या वाढत्या दबावाचा सामना करावा लागत असल्याने बांगलादेश राजकीय गोंधळात आहे.याच पार्श्वभूमीवर सत्ता गमावण्याच्या भीतीपोटी मोहम्मद युनूस यांनी पुन्हा एकदा भारतविरोधी घोषणाबाजीचा सूर आळवला आहे. एका बैठकीत बोलताना बांगलादेशात उद्भवलेल्या राजकीय संकटाला त्यांनी 'भारताने रचलेले षड्यंत्र' म्हटले आहे.
 
बांगलादेशात सुरू असलेल्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर, मोहम्मद युनूस यांनी रविवारी दि. २५ मे एक बैठक बोलावली होती. ही बैठक बांगलादेशातील राजकीय पक्ष आणि इतर संघटनांसोबत होती. या बैठकीत, राजकीय पक्षांनी लवकरच सार्वत्रिक निवडणुका घेण्याची मागणी केली. तथापि, मोहम्मद युनूस यांनी निवडणुकांबाबत कोणताही आराखडा दिला नाही. याउलट त्यांनी भारताविरुद्ध गरळ ओकण्याचे काम केले. जुलै २०२४ नंतर बांगलादेशमध्ये झालेल्या राजकीय बदलांना भारताने स्वीकारले नसल्याचे युनूस म्हणाले.
 
 
भारत आपल्याला नष्ट करण्याचा कट रचत आहे : युनूस
 
या बैठकीला उपस्थित असलेले नागरी औपचारिक परिषदेचे प्रमुख महमुदुर रहमान मन्ना म्हणाले, "त्यांनी (युनूस) चर्चेची सुरुवात असे सांगून केली की आपण एका मोठ्या संकटात आहोत. या संकटाचा अर्थ असा होता की, भारताने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. भारत बांगलादेशमध्ये झालेल्या राजकीय बदल अजिबात स्वीकारू इच्छित नाही. पुढे ते म्हणाले की, शक्य असल्यास, भारत आपल्याला एका दिवसात संपवू इच्छित आहे आणि त्यासाठी ते शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे."
 
लष्कराशी सुरू असलेला संघर्ष
 
बीएनपी आणि बांगलादेशाचे लष्कर यांच्यासोबत सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मोहम्मद युनूस यांनी भारतावर हे बिनबुडाचे आरोप करण्यास सुरुवात केली आहे. मोहम्मद युनूस यांनी ऑगस्ट २०२४ मध्ये सत्तेची सूत्रं हाती घेतली. त्यावेळी लोकांना अपेक्षा होती की काही महिन्यांत निवडणुका होतील. सत्तेच्या हव्यासापायी जवळजवळ १० महिने उलटून गेल्यानंतरही त्यांनी निवडणुकांबाबत कोणताही आराखडा दिलेला नाही. यामुळे बीएनपी त्यांच्यावर नाराज आहे. बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-झमान हेही मोहम्मद युनूसच्या विरोधात गेले आहेत. अलिकडेच मोहम्मद युनूस यांच्या सरकारने म्यानमारच्या रोहिंग्यांना मदत करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांना कॉरिडॉर देण्याची घोषणा केली होती. लष्कराने याला तीव्र विरोध केला. यानंतर मोहम्मद युनूस यांच्या सरकारला माघार घ्यावी लागली.
 
राजीनाम्याची धमकीही कामी आली नाही
 
लष्करप्रमुख जमान यांनी लष्करी कमांडर्सच्या परिषदेत या सर्व गोष्टी सांगितल्या होत्या. त्यांनी मोहम्मद युनूस यांना डिसेंबर २०२५ पर्यंत निवडणुका घेण्यास सांगितले होते. त्यांनी हे देखील स्पष्ट केले होते की केवळ निवडून आलेले सरकारच देश योग्यरित्या चालवू शकते आणि निवडणुकांशिवाय सत्तेवर येणारे लोक नाही. या सर्वानंतर, मोहम्मद युनूस यांनीही राजीनामा देण्याची धमकी दिली होती. तथापि, युनूस यांनी सत्तेतून पायउतार होण्यासाठी विशेष पावलं न उचलल्याने ही धमकीही खोटी ठरली. या सगळ्यानंतर मोहम्मद युनूस यांनी आपली खुर्ची वाचवण्यासाठी आता भारतावर आरोप करायला सुरुवात केली आहे. भारताने अद्याप यावर कोणतेही अधिकृत उत्तर दिलेले नाही.
 
 
 
 
 
 

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\