मुंबई : शरद पवार साहेबांवर आम्ही विश्वास ठेवला होता. परंतू, त्यांनी विश्वासघात केल्याचे सिद्ध झाले आहे, अशी प्रतिक्रिया उबाठा गटाचे नेते विनायक राऊत यांनी दिली आहे. टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे विधान केले.
शरद पवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पुरस्कार प्रदान करत त्यांचे कौतूक केले. यावरून उबाठा गटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. संजय राऊतांनी हा मुद्दा उपस्थित करत शरद पवारांवर टीका केली. दरम्यान, आता विनाय राऊतांनीही संजय राऊतांच्या भूमिकेला समर्थन दिले आहे.
विनायक राऊत म्हणाले की, "शरद पवार साहेबांनी एका गद्दार आणि बेईमान व्यक्तीचा सन्मान केल्याबद्दल संजय राऊतांनी मांडलेल्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत. शरद पवार साहेबांवर आम्ही विश्वास ठेवला होता. पण विश्वासघात झाल्याचे सिद्ध झाल्यानंतर संजय राऊतांना बोलण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही," असे ते म्हणाले.
दुसरीकडे, उद्धव ठाकरेंचे कोकणातील शिलेदार राजन साळवी यांनी राजीनामा दिला असून लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे उबाठा गटाला मोठे खिंडार पडले आहे. दरम्यान, आता उबाठा गटाकडून या सगळ्या परिस्थितीवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.