मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : ताज हा प्रत्येक भारतीयाचा अभिमान
10-Feb-2025
Total Views | 104
मुंबई : ताज हे केवळ हॉटेल नसून प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे. मुंबईसह नागपूर येथेसुद्धा ताज हॉटेल सुरु करण्यात यावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, १० फेब्रुवारी रोजी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वांद्रे परिसरात ताज बॅण्डस्टॅण्ड या नव्या हॉटेलचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार, माजी मंत्री दीपक केसरकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मुंबई ही भारताची कन्व्हेन्शन कॅपिटल म्हणून उदयास येत आहे. ताज ग्रुपच्या नव्या हॉटेलमधील आधुनिक कन्व्हेन्शन सेंटरमुळे मुंबईतील व्यावसायिक संधी अधिक वाढतील. ताज हॉटेल मुंबईच्या सौंदर्यात भर घालणारे असून पर्यटन तसेच व्यावसायिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरणार आहे. हे हॉटेल भविष्यात मुंबईची एक नवी ओळख निर्माण करेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ताज हा भारतीयांचा अभिमान!
"ताज हे केवळ एक हॉटेल नसून, प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे. भारताच्या विकासात टाटा समूह आणि विशेषतः ताज हॉटेल्सचा मोठा वाटा आहे. मुंबईत आणखी नव्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुविधा असलेल्या हॉटेल्सची गरज आहे. यासाठी या क्षेत्रातील कंपन्यांनी नव्या प्रकल्पांची उभारणी करावी," असे आवाहन त्यांनी केले.
हे हॉटेल टाटा समूहाचे मार्गदर्शक दिवंगत रतन टाटा यांच्या महत्त्वपूर्ण स्वप्नांपैकी एक होते. ते स्वप्न आता प्रत्यक्षात उतरत आहे. या माध्यमातून मुंबईच्या पर्यटन आणि व्यावसायिक प्रगतीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. नागपूरमध्येही अत्याधुनिक सुविधांसह हॉटेल उभारण्याचा टाटा ग्रुपचा विचार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह नागपूरमध्ये ताज हॉटेल सुरु करावे," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.