ज्येष्ठ लेखिका मृदुला गर्ग यांच्या हस्ते ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्धाटन
वाचकांना अनुभवायला मिळणार साहित्यिक कार्यक्रमांची मेजवानी
07-Dec-2025
Total Views |
मुंबई : ( Literature Conference ) मराठ्यांची राजधानी सातारा येथे पार पडणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्धाटन प्रख्यात हिंदी लेखिका विचारवंत डॉ. मृदुला गर्ग यांच्या हस्ते होणार आहे. त्याच बरोबर या साहित्य संमेलनाचे समारोप सोहळ्यास ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मनित ज्येष्ठ लेखक रघुवीर चौधरी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. पानिपतकार विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सुमारे ३२ वर्षानंतर संमेलनाचे आयोजन करण्याचा मान सातारकरांना मिळाला आहे.
गुरुवार दि. १ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजल्यापासून संमेलनातील कार्यक्रमांचा शुभारंभ होणार असून अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. ग्रंथदिंडीसह ग्रंथ प्रदर्शन, कवीकट्टा आणि गझलकट्टा यांचेही उद्धाटन यावेळी पार पडणार आहे. सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिकांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांच्या सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात आले असून हा सन्मान संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते संमेलनाच्या पूर्वसंध्येला करण्यात येणार आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मोत्सवानिमित्त आणि जगद्गुरु संत तुकोबाराय यांच्या ३७५ व्या वैकुंठगमन वर्षानिमित्त संत साहित्याला अभिवादन करण्यासाठी ‘बहुरूपी भारुड’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. डॉ.भावार्थ देखणे आणि त्यांचे सहकारी हा कार्यक्रम रात्री साडेआठ वाजता सादर करणार आहेत. त्यापूर्वी स्वानंद बेदरकर निरूपण करणार आहेत.
शुक्रवार दि. २ जानेवारी रोजी साहित्य संमेलनाचे उद्धाटन मृदुला गर्ग यांच्या हस्ते होणार असून, या प्रसंगी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील, मावळत्या संमेलनाध्यक्ष डॉ.तारा भवाळकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाषामंत्री उदय सामंत, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, ज्येष्ठ उद्योजक फरोख कुपर, सार्वजनिक बांधकाम मंत्री व स्वागताध्यक्ष शिवेंद्रराजे भोसले, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह अखिल भारतीय साहित्य महामंहळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांची उपस्थिती राहणार असून, हा कार्यक्रम मुख्य मंडपात होणार आहे. मंडप क्रमांक १ येथे दुपारी ३ वाजता निमंत्रितांचे पहिले कविसंमेलन रंगणार असून रात्री ८:३० वाजता सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘शिकायला गेलो एक’ या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. मंडप क्रमांक २ येथे दुपारी ३ वाजता ‘जागतिक प्रकाशन व्यवहारात मराठी प्रकाशन व्यवहार कुठे आहे ? या विषयावर चर्चा होणार असून त्यात संजीव कुलकर्णी, क्षुभा साठे, अमृता तांदळे, राजीव श्रीखंडे, रोहन चंपानेरकर, डॉ. मनोज कामत, संदीप तापकीर यांचा सहभाग असणार आहे. त्यानंतर दुपारी ४:३० वाजता ‘मराठी कोशवाङ्मय आणि विस्ताराच्या दिशा’ या विषयावरील चर्चेत डॉ. राजा दीक्षित, डॉ. साहेब खंदारे, डॉ. नीलिमा गुंडी, मांगिलाल राठोड, प्रमोद पाटील, अविनाश कोल्हे सहभागी होणार आहेत. जगतानंद भटकर त्यांच्याशी संवाद साधणार आहे.
शनिवार, दि. ३ जानेवारी रोजी मंडप क्रमांक १ येथे सकाळी ९:३० वाजता कथाकथन होणार असून यात राजेंद्र गहाळ, माधवी घारपुरे, बाबा परीट, रवींद्र कोकरे, कल्पना देशपांडे सहभागी होणार आहेत. सकाळी ११ वाजता साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांची मुलाखत होणार असून डॉ. रणधीर शिंदे आणि प्रा. प्रवीण बांदेकर त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. दुपारी ३ वाजता ज्येष्ठ लेखक प्रकाशक सन्मान कार्यक्रमात साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ लेखक ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड तसेच सुविद्या प्रकाशनाचे बाबुराव मैंदर्गीकर, सोलापूर यांचा सत्कार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या वेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील उपस्थित राहणार आहेत. समकालीन पुस्तकांवर दुपारी ४ वाजता चर्चात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यात अमोल पालेकर लिखित ‘ऐवज : एक स्मृतिबंध’ या पुस्तकावर संवादात्मक कार्यक्रम होणार आहे.
त्यात अमोल पालेकर यांच्यासह संध्या गोखले आण वृंदा भार्गवे सहभागी होणार आहेत. सायंकाळी ५:३० वाजता ‘आजच्या मराठी समाजाची विचारभ्रष्टता आणि वैचारिक साहित्याची निर्मिती’ या विषयावर परिसंवाद होणार असून विनय हर्डीकर, प्रमोद काळबांडे, शाळीग्राम निकम, डॉ. संभाजी पाटील, ॲड. धनंजय वंजारी, हेरंब कुलकर्णी, यशवंत पाटणे हे मान्यवर सहभागी होणार आहेत. रात्री ९ वाजता महाराष्ट्राची हास्यजत्रा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.शनिवार, दि. ३ जानेवारी रोजी मंडप क्रमांक २ येथे सकाळी १० वाजता ‘आजच्या मराठी साहित्यात भयकथा, रहस्यकथा आणि गूढकथा यांचा इतका दुष्काळ का आहे?’ या विषयावर चर्चा होणार असून यात डॉ. गणेश मतकरी, प्रवीण टोकेकर, हृषीकेश गुप्ते, डॉ. गोविंद बुरसे, डॉ. राजेंद्र राऊत यांचा सहभाग असणार आहे. दुपारी ४ वाजता ‘स्त्री चळवळीची पन्नास वर्षे : मागे वळून पाहताना’ या विषयावर आयोजित परिसंवादात डॉ. गीताली वि. म., सुचिता खल्लाळ, प्रमोद मुनघाटे, हिना कौसर खान, डॉ. सविता मोहिते, डॉ. गायत्री शिरोळे, डॉ. संध्या अणवेकर, डॉ. अंजली ढमाळ, नमिता कीर सहभागी होणार आहेत. सायंकाळी ६ वाजता ‘अभिजात दर्जानंतरची मराठी : संधी आणि आव्हाने’ या विषयावर चर्चा होणार असून यात श्रीधर लोणी, पी. विठ्ठल, डॉ. सुभाष उगले, श्याम जोशी, डॉ. संदीप श्रोत्री, डॉ. चैत्री साळुंके, डॉ. अस्मिता हवालदार यांचा सहभाग असणार आहे.
रविवार, दि. ४ जानेवारी रोजी मंडप क्रमांक १ येथे सकाळी ९:३० वाजता लेखक शाहू पाटोळे लिखित ‘अन्न हे अपूर्णब्रह्म’ या पुस्तकावर चर्चा आयोजित करण्यात आली असून त्यात पाटोळे यांच्यासह राहुल कोसंबी, डॉ. मिलिंद कसबे, भूषण कोरगावकर सहभागी होणार आहेत. सकाळी ११ वाजता लोकसत्ताचे संपादक आणि प्रसिद्ध लेखक गिरीश कुबेर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे. त्यांच्याशी लेखक किशोर बेडकीहाळ आणि पत्रकार प्रसन्न जोशी संवाद साधणार आहेत. दुपारी १ वाजता दुसरे निमंत्रितांचे कविसंमेलन होणार आहे.
मंडप क्रमांक २ येथे सकाळी १० वाजता ‘बदलत्या ग्रामीण वास्तवाचे चित्रण आजच्या मराठी साहित्यात दिसत का नाही?’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून यात भूषण कुमार उपाध्याय, चंद्रकांत दळवी, श्रीकांत पाटील, भगवान काळे, चांगदेव काळे यांचा सहभाग असणार आहे. दुपारी १२:३० वाजता ‘संवाद लक्षवेधी कादंबरीकारांशी’ हा संवादात्मक कार्यक्रम होणार असून यात प्रा. शेषराव मोहिते, डॉ. सदानंद देशमुख, नीरजा, कृष्णात खोत, अभिराम भडकमकर हे कादंबरीकार सहभागी होणार असून त्यांच्याशी राजेंद्र माने आणि निलेश महिगांवकर संवाद साधणार आहेत.
या संमेलनात बालकुमार वाचककट्ट्यावर साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित लेखक ल.म. कडू, संगीता बर्वे, राजीव तांबे, एकनाथ आव्हाड व गणेश घुले हे बालवाचकांशी संवाद साधणार आहेत.दुपारी ४:३० वाजता ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सांगता होणार असून या प्रसंगी ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ लेखक रघुवीर चौधरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, पालकमंत्री शंभुराज देसाई, रोजगार हमीमंत्री भरत गोगावले, ज्येष्ठ उद्योजक फरोख कुपर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. महाराष्ट्रातील लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या व लोकांच्या पसंतीस उतरलेल्या तरुणाईच्या ‘फोक आख्यान’चे आयोजन रात्री करण्यात आले आहे.