आढावा महाराष्ट्राच्या प्रगतीचा... 100 दिवसांच्या कार्यक्रमाचा!

योजनांना वेग, प्रशासनाला दिशा!

    17-Dec-2025
Total Views |
Devendra Fadnavis
 
मुंबई : ( Devendra Fadnavis ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथे 100 दिवसांच्या कार्यक्रमाची सद्यस्थिती व केलेल्या घोषणांच्या पुर्ततेसंदर्भात आढावा बैठक पार पडली.
 
लोकहितांच्या योजनांसाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना अधिकाधिक सुलभ आणि सहज सुविधा उपलब्ध होतील यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा प्रत्येक विभागामध्ये वापर करण्यात यावा, तसेच महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या योजनांना गती देण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाचा विस्तार करताना त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांचा समावेश करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
 
100 दिवसांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी येणाऱ्या तांत्रिक, प्रशासकीय अथवा इतर कोणत्याही स्वरूपाच्या अडचणी तात्काळ सोडविण्यात याव्यात, तसेच सर्व विभागांनी लोकहिताशी संबंधित कामांना अधिक गती द्यावी आणि गुणवत्तापूर्ण कामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. 
 
हेही वाचा : Vanvasi Kalyan Ashram School : वनवासी कल्याण आश्रम शाळा माणगाव येथे रांगोळी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
 
राज्य शासनाच्या 100 दिवसांच्या धोरणात्मक कार्यक्रमांतर्गत विविध विभागांमधील प्रलंबित कामांच्या आढाव्यानुसार दिनांक 16 डिसेंबर 2025 पर्यंतच्या धोरणात्मक बाबींमध्ये 883 मुद्द्यांपैकी 807 मुद्द्यांवरील कार्यवाही पूर्ण करण्यात आली असून 91% पूर्णत्वाचे प्रमाण साध्य झाले आहे. 1 मे 2025 रोजी हे प्रमाण 78% होते, त्यामुळे अल्प कालावधीत लक्षणीय प्रगती झाल्याचे स्पष्ट होते.
 
या 100 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत 76 महत्त्वाचे मुद्दे सध्या प्रगतीपथावर असून अनेक महत्वाच्या विभागांमध्ये ठोस कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील विविध कार्यक्रम, दौरे व समारंभादरम्यान केलेल्या घोषणांचा सविस्तर आढावा या बैठकीदरम्यान घेण्यात आला. या आढाव्यानुसार 48 घोषणांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.
 
औद्योगिक व पायाभूत सुविधा विकास, तीर्थक्षेत्र व पर्यटन विकास प्रकल्प, जलसंधारण व पाणीपुरवठा योजना, तसेच आरोग्य सेवा बळकटीकरण आणि वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठीचे निर्णय या घोषणांतून शासनाचा विकासाभिमुख दृष्टिकोन स्पष्ट होतो. याशिवाय इलेक्ट्रिक वाहन धोरण, पर्यावरणपूरक उपक्रम, कौशल्य विकास व रोजगारनिर्मिती, नवीन तंत्रज्ञान, तसेच डिजिटल व स्मार्ट प्रशासन यावरही विशेष भर देण्यात आला आहे.
 
हे वाचलत का? - महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या योजनांना गती द्या; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
 
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी खालील महत्वाच्या विषयांचा आढावा घेतला :
 
पेन्शन सुधारणा
 
निती आयोगाकडून एपीआय प्राप्ती
 
तृतीयपंथी व्यक्तींसाठी बीजभांडवल, रोजगारनिर्मिती, कौशल्यविकास आणि निवारा गृहांची स्थापना इत्यादीबाबत योजना तयार करणे
 
सुधारित विद्यार्थी हरीत सेना योजनेअंतर्गत 'चला जाऊया वनाला' उपक्रम राबविणे
 
वाघ/बिबटया गावात येताच नागरिकांना धोक्याची सूचना देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानावर आधारित ड्रोन व आभासी भिंत यंत्रणा उभारणे
 
5000 गिरणी कामगारांच्या घरांचे डिपीआर मंजूर करणे
 
विविध कार्पोरेशन आणि त्यांच्या उपकंपन्यांसाठी एक युनिव्हर्सल पोर्टल तयार करणे
 
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ नाशिक- मुंबई राष्ट्रीय महामार्ग (भाग-ठाणे ते वडपे) सुधारणा करण्याच्या कामामधील पूल व भूयारी मार्ग पूर्ण करणे
 
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील 13.30 किमी मिसिंग लिंकचे काम पूर्ण करणे
 
पवनार ते पत्रा देवी (नागपूर-गोवा) शक्ती पीठ द्रुतगती महामार्ग भुसंपादन प्रक्रियेअंतर्गत संयुक्त मोजणीची कार्यवाही पूर्ण करणे
 
आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता खेळाडूंसोबत कोच व फिजिओथेरपिस्ट घेऊन जाण्यासाठी आर्थिक सहाय्य करणेबाबत शासन निधी किंवा सीएसआर मधून निधी उपलब्ध करून देण्यासाठी धोरण ठरविणे
 
नागरिकांना स्मार्ट शिधापत्रीका वितरित करणे
 
ड्रोन धोरण निश्चित करणे
 
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) धोरण निश्चित करणे
 
प्रायोगिक तत्वावर दहा ठिकाणी नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेची सतत तपासणी (Real Time Monitoring) करण्याकरिता अत्याधुनिक यंत्रणा उभारणे
 
प्रस्तावित शिवसृष्टी थीम पार्क उच्चस्तरीय समिती व शिखर समितीची मान्यता
 
यावेळी संबंधित अधिकारी उपस्थित होते.