Tirupati Balaji : तिरुपती लाडूसाठी २५० कोटींचं बनावट तूप! दिल्लीतील व्यापारी अजय कुमार सुगंधा अटकेत

Total Views |
Tirupati Balaji
 
मुंबई : (Tirupati Balaji) तिरुपती बालाजी मंदिरात प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या प्रसिद्ध लाडूसाठी वापरले जाणारे तूप शुद्ध नसून बनावट असल्याचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. भोले बाबा डेअरी नावाच्या कंपनीने तब्बल पाच वर्षांपासून (२०१९ - २०२४) तिरुमला तिरुपती देवस्थानला (Tirupati Balaji) २५० कोटींचे बनावट तूप पुरवल्याचं सीबीआय - एसआयटी तपासात स्पष्ट झालं आहे. याप्रकरणी दिल्लीतील व्यापारी अजय कुमार सुगंधा याला अटक करण्यात आली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, या डेअरीने खऱ्या दुधाऐवजी पाम ऑईल आणि केमिकल्सपासून बनवलेलं मिश्रण तूप म्हणून पुरवलं. हे मिश्रण सुगंध आणि रंगासाठी कृत्रिम पदार्थ वापरून तूपासारखं दिसेल अशा पद्धतीने तयार केलं जात होतं. सीबीआय - एसआयटीने केलेल्या लॅबोरेटरी चाचणीत उघड झालं की तूपामध्ये दुधातील कोणतंही फॅट नव्हतं. त्यामुळे हे पूर्णपणे बनावट असल्याचं सिद्ध झालं. (Tirupati Balaji)
 
हेही वाचा :  Bihar Exit Poll 2025 : बिहारमध्ये भाजप-एनडीए पुन्हा सत्तेत! महागठबंधन शंभरी पार करण्यातही अपयशी
सध्या या प्रकरणात भोले बाबा डेअरीचे मालक, पुरवठा साखळीतील काही अधिकारी आणि तिरूमला तिरूपती देवस्थानच्या (Tirupati Balaji) खरेदी विभागातील काही कर्मचाऱ्यांवर संशय व्यक्त केला जात आहे. सीबीआय - एसआयटीने आर्थिक अनियमितता, फसवणूक आणि धार्मिक भावनांचा अपमान या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
 
या घोटाळ्यामुळे लाडू प्रसादाची शुद्धता आणि श्रद्धाळूंचा विश्वास दोन्ही प्रश्नचिन्हाखाली आले आहेत. तिरूमला प्रशासनाने सांगितलं की, या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई केली जाईल आणि पुढे सर्व तुपाच्या बॅचेसची स्वतंत्र लॅबमध्ये चाचणी केली जाईल.
 
आंध्र प्रदेशचे मानव संसाधन विकास मंत्री नारा लोकेश यांच्याकडून ‘X’ पोस्ट करत संताप व्यक्त
 
सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या SIT ने सत्य समोर आणले आहे. दोषींना कायद्याचा फटका बसणार आहे. हे केवळ भेसळ प्रकरण नाही, तर हिंदूंच्या श्रद्धेवर थेट प्रहार आहे, आपल्या विश्वासाचा अपमान आहे आणि भारताच्या आत्म्याविरुद्धचा गुन्हा आहे. पवित्रतेशी खेळ करणाऱ्यांना आता त्याची किंमत चुकवावीच लागेल.
 
 

चारूदत्त टिळेकर

बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.