सफाई कर्मचारी हा मुंबईचा खरा हिरो : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
"स्वच्छता ही सेवा" राज्यस्तरीय अभियानाचा गिरगाव चौपाटीवर शुभारंभ!
19-Sep-2024
Total Views | 45
मुंबई : सफाई कर्मचारी हा मुंबईचा खरा हिरो आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले आहे. गुरुवारी 'स्वच्छता ही सेवा' राज्यस्तरीय अभियानाचा गिरगाव चौपाटीवर शुभारंभ पार पडला. यावेळी त्यांनी स्वतः कचरा उचलून या अभियानात प्रत्यक्ष सहभाग घेतला.
यावेळी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी आणि मुंबई महानगरपालिकेचे हजारो कर्मचारी उपस्थित होते. हे स्वच्छता अभियान पुढील पंधरा दिवस चालणार असून २ ऑक्टोबर रोजी या अभियानाचा समारोप होणार आहे. या अभियानात राज्यातील नागरी व ग्रामीण भागात 'स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छता' ही संकल्पना राबविण्यात येणार आहे.
याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "२०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू करून देशाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले होते. त्यानुसार मुंबईत डीप क्लिन ड्राइव्ह हा उपक्रम सुरू करून संपूर्ण शहर स्वच्छ करण्यात आले. मुंबईतील अनेक संस्था आणि संघटनांनी त्यात सहभाग घेतला. मुंबईसह राज्यातील वाढते तापमान आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर झाडे लावण्यात येत आहेत. आता सुरू होणाऱ्या 'स्वच्छता ही सेवा' हे अभियान एक चळवळ म्हणून हाती घेऊन संपूर्ण राज्यात राबविण्यात येईल," असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, "स्वच्छता पंधरवाड्यात सर्वांचा सहभाग असायला हवा. Resuce, Reuse आणि Recycle ही केंद्रे स्थापण करण्यात येणार आहेत. तसेच पर्यटन स्थळांवर शुन्य कचरा कार्यक्रम राबवण्यात येईल. या स्वच्छ भारत अभियानामध्ये महाराष्ट्र कुठेही कमी पडणार नाही. सफाई कर्मचारी हा मुंबईचा खरा हिरो आहे आणि एक टीम बनून आपण हे काम करत आहोत. यावेळी स्वभाव स्वच्छता - संस्कार स्वच्छता हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. आपल्या हितचिंतकांनी स्वभाव आणि संस्काराच्या स्वच्छतेवर लक्ष द्यायला हवं. स्वभाव आणि संस्काराची स्वच्छतेवर लक्ष दिल्यास आपला देश वेगाने विकसित होईल," असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.