"परदेशात जाऊन मनाला येईल ते बरळणं लोकप्रतिनिधीला शोभत नाही!"
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची राहूल गांधींवर टीका
11-Sep-2024
Total Views | 72
मुंबई : परदेशात जाऊन मनाला येईल ते बरळणं लोकप्रतिनिधीला शोभत नाही, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राहूल गांधींवर केली आहे. राहूल गांधींनी अमेरिका दौऱ्यावर असताना आरक्षणविरोधात वक्तव्य केलं होतं. यावरून त्यांच्यावर सर्वत्र टीका करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "विदेशात जाऊन सातत्याने भारताची येथील नागरिकांची बदनामी करण्याचा उद्योग विरोधी पक्षनेते, लोकप्रतिनिधी राहुल गांधी करतात. परदेशात जाऊन मनाला येईल ते बरळणे, बेछूट आरोप करणे लोकप्रतिनिधीला शोभत नाही. मात्र बोलताना त्यांनी काँग्रेसचा आरक्षणविरोधी खरा चेहरा उघड केला. आरक्षण संपवण्याचा मनसुबा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत व्यक्त केला आहे. आरक्षण संपवण्याची भाषा करणारे राहुल गांधींचे हे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे. शिवसेना व महायुतीतील सहकारी पक्ष आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत आणि आरक्षण संपवू देणार नाही," अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच आरक्षणाला धक्का लावण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही हाणून पाडू, असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "आपला भारत देश ही ‘फेअर प्लेस’ नाही, असे परदेशात जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांसमोर बोलणं हे भारतातील नागरिकांसाठी अत्यंत अवमानकारक आहे. राहुल गांधी हे परकीय मानसिकतेलाच धार्जिणे आहेत, हे या निमित्ताने सिद्ध होते. अनेक सर्वसामान्य भारतीय विद्यार्थ्यांनी जागतिक पातळीवर आपल्या बुद्धितेजाने लोकांची मने जिंकली आहेत. स्वामी विवेकानंदांपासून ते आजच्या आयटी क्षेत्रातील बुद्धिमंत विद्यार्थ्यांपर्यंत अनेकांनी अमेरिकेत भारताचा ध्वज उंचावला आहे. त्या सगळ्यांचा अवमान राहुल गांधी यांनी केला आहे. देशाचा, आमच्या अस्मितांचा आणि नागरिकांचा अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही आणि मान्यही होणार नाही," असे म्हणत त्यांनी राहूल गांधींच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला.