"राहुल गांधी कोणत्याही व्यासपीठावर गेले तरी..."; उपमुख्यमंत्री फडणवीसांची टीका
11-Sep-2024
Total Views | 339
मुंबई : राहुल गांधी कोणत्याही व्यासपीठावर गेले तरी देशातील प्रत्येक वर्गाला त्यांचे हक्क मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. राहूल गांधींनी अमेरिकेत आरक्षणबाबत केलेल्या वक्तव्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "राहुल गांधी यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर नेहमीच देशविरोधी वक्तव्ये केली आहेत. ती कोणत्याही प्रकारे राष्ट्रहिताच्या दृष्टीने नाहीत. आरक्षण संपवण्याबाबत राहुल गांधी यांनी नुकतेच केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात राहुल गांधी आणि काँग्रेसने आरक्षणाबाबत खोटा नरेटिव्ह पसरवला पण आता त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "राज्यघटनेचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आरक्षण कोणीही संपवू शकत नाही. राहुल गांधींनी कोणत्याही व्यासपीठावर जाण्याचा प्रयत्न केला तरी देशातील प्रत्येक वर्गाला त्यांचे हक्क मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही," असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.