नवी दिल्ली : कलम ३७० आणि ३५ अ पुन्हा लागू करणे, पाकिस्तानसोबत चर्चा करणे आणि राजकीय कैद्यांची सुटका करणे; अशी आश्वासने अब्दुल्ला कुटुंबाच्या नॅशनल कॉन्फरन्सने जम्मू – काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीसाठी दिली आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू – काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर जम्मू – काश्मीरमधील राजकीय पक्षदेखील सज्ज झाले आहेत. प्रदेशात दीर्घकाळ सत्ता उपभोगणाऱ्या नॅशनल कॉन्फरन्सनेदेखील निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रकाशित केला आहे.
नॅशनल कॉन्फरन्सने जम्मू-काश्मीरला राजकीय आणि कायदेशीर दर्जा बहाल करण्याचे आणि प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्याचे आश्वासन दिले आहे. स्वायत्ततेच्या प्रस्तावाची पूर्ण अंमलबजावणी, कलम ३७० आणि ३५(अ ) पुनर्स्थापना आणि राज्याचा दर्जा यासाठी प्रयत्नशील राहू असे जाहीरनाम्यात म्हटले आहे. पाकिस्तानसोब चर्चेला प्रोत्साहन देणे आणि तुरुंगातील राजकीय कैद्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करू. सार्वजनिक सुरक्षा कायदा रद्द करण्याव्यतिरिक्त आणि काश्मिरी पंडितांच्या सन्मानजनक परतीच्या व्यतिरिक्त, नोकरीची पडताळणी आणि पासपोर्ट जारी करण्यासाठी सोपी प्रक्रिया करण्याचे आश्वासन दिले आहे.