अजित पवार राजकारणात फिट नाहीत, त्यांना काहीही कळत नाही : संजय राऊत
14-Aug-2024
Total Views | 99
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार राजकारणात फिट नाहीत. त्यांना राजकारणातलं काहीही कळत नाही, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. लोकसभा निवडणूकीत सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवारांना उभं करणं, ही माझी चूक होती, असं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं. यावर राऊतांनी प्रतिक्रिया दिली.
संजय राऊत म्हणाले की, "अजित पवारांना ही उपरती कशी झाली ते माहिती नाही, पण गेल्या काही दिवसांपासून सल्ला देण्यासाठी त्यांनी एक एजन्सी नेमलेली आहे. आतापर्यंत ते त्यांच्या प्रिय काकांच्या सल्ल्याने चालायचे. त्यामुळे तोपर्यंत त्यांचं बरं चाललं होतं. पण काकांची साथ सोडल्यावर त्यांची अधोगती सुरु झाली. त्यांची पावलं चुकीच्या दिशेने पडू लागली. लोकसभा निवडणूकीत हे दिसल्यावर त्यांनी एक एजेंसी नेमली. एजेंसी नेमण्याची पद्धत ही भाजपने आणली आहे. याचा अर्थ अजित पवारांना राजकारणात काही कळत नाही. भाजपच्या सल्ल्याने त्यांचं हे विधान आलं असेल," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "बारामतीमध्ये बहिण विरुद्ध पत्नी हा सामना चुकीचा आहे, हे त्यावेळी महाराष्ट्रातील सामान्य जनतेला कळत होतं. पण ही गोष्ट पाच वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीला कळली नाही. याचा अर्थ ते राजकारणात फिट नाहीत. विधानसभा निवडणूकीच्या आधी ते काहीही करु शकतात. लोकसभेत फटका बसल्यावर विधानसभेतसुद्धा त्यांचे पाय मातीला लागू नये यासाठी ते राखी बांधायला जातील. ते भाऊबीजेलासुद्धा स्वत: जातील. पण आता सुप्रिया सुळे काय करतात हा प्रश्न आहे. सुप्रिया सुळेंसाठी बारामतीत महाराष्ट्र लढला आहे," असेही संजय राऊत म्हणाले.