नागरिकांची गैरसोय होऊ देऊ नका! उपमुख्यमंत्री फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
20-Jul-2024
Total Views | 41
नागपूर : नागपूरात सकाळापासूनच जोरदार पाऊस सुरु असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. मुसळधार पावसामुळे नागपूरातील अनेक घरांमध्ये पाणी साचलं आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "नागपूर शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. मी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्कात असून स्वतः जिल्हाधिकारी शहराचा दौरा करीत आहेत. शाळांना सुटी देण्यात आली असून ज्या सखल भागात पाणी शिरले तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. कुही परिसरात काही रस्ते बंद झाले आहेत. नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे," असे निर्देश त्यांनी दिसे आहेत.
ते पुढे म्हणाले की, "नागपूर विभागात सुद्धा गडचिरोलीतील काही भागांचा संपर्क तुटला आहे. विभागीय आयुक्त सातत्याने सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्कात आहेत. त्यांनाही सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्यास सांगण्यात आले आहे," अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे.
दरम्यान, शनिवारी सकाळपासूनच राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरु असून सखल भागात पाणी साचले आहेत. यातच नागपूरातील काही भागांमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी साचले आहे. तसेच अनेकांच्या घरांमध्ये पाणी साचल्याने त्यांची गैरसोय झाली आहे.