सातारा : स्वागतावेळी दिलेल्या वाघनखांनी काहींच्या बुद्धीवर चढलेली बुरशी काढण्याचं काम मुख्यमंत्री करतील, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर केली आहे. दरम्यान, शुक्रवार, १९ जुलै रोजी वाघनखांसोबत शिवकालीन इतर शस्त्रास्त्रांच्या ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ या प्रदर्शनाचे उद्धाटन पार पडले. यावेळी ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "या वाघनखांच्या माध्यमातून प्रत्यक्ष छत्रपतींच्या इतिहासाशी जुळण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. आपल्या देशातील काही लोकांना उठसुट प्रत्येक गोष्टीत काहीतरी विवाद उभा करायचा, हा एकच धंदा आहे. पण खरंतर हा रोग आजचाच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनाही या रोगाचा सामना करावा लागला होता. स्वराज्यातही काही ना काही शंका उपस्थित करणारे लोक होते. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी या शंका संपवून रयतेचं राज्य प्रस्थापित करुन दाखवलं."
ते पुढे म्हणाले की, "सुधीरभाऊंनी मुख्यमंत्र्यांच्या स्वागतावेळी त्यांना वाघनखं दिली. आपल्याला कोणाचा कोथळा तर काढायचा नाही पण काहींच्या बुद्धीवर बुरशी आली आहे आणि काहींच्या बुद्धीवर जंग चढला आहे. मुख्यमंत्री त्या वाघनखांनी ही बुरशी आणि जंग काढण्याचं काम करतील."
प्रभु श्रीरामांप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरूष आहेत. ते आमचे आराध्य दैवत आहेत. त्यामुळे त्यांच्या इतिहासाशी जुळण्याची कुठलीही संधी मिळाली तरी ती आपण प्राप्त केलीच पाहिजे. केवळ साताराच नाही तर देशातील एक एक व्यक्ती ही वाघनखं पाहण्यासाठी येईल," असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.