विधवा महिलांना वारसा प्रमाणपत्रासाठी आता केवळ १० हजार रुपये शुल्क!
राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
27-Jun-2024
Total Views | 135
मुंबई : विधवा महिलांना वारसा प्रमाणपत्रासाठी आता ७५ हजार रुपयांऐवजी केवळ १० हजार रुपये शुल्क भरावे लागणार आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विधवा महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पतीच्या मृत्यपश्चात महिलांना त्यांच्या मिळकतीवर वारस म्हणून नोंद करण्यासाठी दिवाणी न्यायालयाकडून वारसा प्रमाणपत्र घ्यावे लागते. त्यासाठी आकारण्यात येणारे ७५ हजार रुपयांचे शुल्क कमी करून १० हजार रुपये करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
पतीच्या मृत्यूनंतर विधवा महिलांना बऱ्याच वेळा आर्थिक उत्पन्नाचे पुरेसे साधन राहत नाही. त्यामुळे कोर्ट फी शुल्काची रक्कम आणि वकील फी यामुळे अनेकवेळा मिळकतीवर वारस म्हणून नाव नोंद करणे राहून जाते. भविष्यात मिळकतीचे कौटुंबिक वाद उद्भवल्यास या महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यात आर्थिक समस्या ही प्रमुख बाब आहे. सधन कुटुंबातील महिलांनाही अनेकदा आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते.
शासन विधवा महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवित आहे. विधवा महिलांना होणाऱ्या त्रासाच्या तुलनेत शासन महसूलाची हानी अल्प प्रमाणात असल्याचे निरीक्षण सर्वच उत्पन्न गटातील महिलांना ही सवलत लागू करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.