मुंबई : विधानसभा निवडणूकीच्या तारखांची घोषणा होण्याआधीच मविआमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन घमासान सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. उबाठा गटाच्या संजय राऊतांनी नेहमीप्रमाणे मुख्यमंत्रीपदावर दावा केला. त्यामुळे निवडणूकीआधी त्यांचा फाजील आत्मविश्वास वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
संजय राऊत म्हणाले की, "महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाचा चेहऱ्याशिवाय निवडणूकीला सामोरं जाणं धोका आहे. महाराष्ट्राने महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं काम पाहिलेलं आहे. अनेक घटकांचं लोकसभेतील मतदान उद्धव ठाकरेंकडे पाहून झालेलं आहे. पण बिन चेहऱ्याचं सरकार अजिबात चालणार नाही. लोकं स्विकारणार नाहीत. त्यामुळे लोकांना चेहरा द्यावाच लागेल," असं सूचक विधान त्यांनी केलं आहे.
यावर महाविकास आघाडीतील इतर नेत्यांनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री पदाबद्दल बोलताना शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील म्हणाले की, "अ ब क मुख्यमंत्री यावर महाविकास आघाडीच्या कुठल्याही नेत्याने स्वारस्य घेऊ नये. आपण सत्तेवर आले पाहिजे हे स्वारस्य पहिलं पाहिजे. कोण मुख्यमंत्री हे निवडून आल्यानंतर नेते आणि कार्यकर्ते ठरवतील."
तर यावर रोहित पवार म्हणाले की, "ही लढाई मुख्यमंत्री पदाची नाही तर स्वाभिमानाची आणि सामान्य लोकांच्या हिताचे सरकार या महाराष्ट्रामध्ये आणण्याची लढाई आहे. पदासाठी लढण्यापेक्षा विचारासाठी लढावे," असा सल्लाच त्यांनी राऊतांना दिला आहे. दरम्यान, यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीदेखील भाष्य केलं. ते म्हणाले की, "वैयक्तिक मत व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण मुख्यमंत्रिपदाबाबत महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये जो निर्णय होईल तो फॉर्म्युला अंतिम असेल."