मुंबई : आताच्या सरकारने पाणीपट्टीत १० पट वाढ केली, अशी खोटी बातमी काँग्रेसने पसरवली आहे. पण वास्तविक ही दरवाढ महाविकास आघाडी सरकारनेच केली होती, अशी पोलखोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. तसेच काँग्रेस ही फेकन्यूज आणि फेक नरेटिव्हची जणू फॅक्टरीच असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "काँग्रेसने आता बातमी पसरविली की, आताच्या सरकारने पाणीपट्टीत १० पट वाढ केली. पण, खरोखर ही वाढ केली कुणी? २९ मार्च २०२२ रोजी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधीकरणाने (एमडब्ल्यूआरआरए) एक आदेश जारी केला आणि त्यानुसार ही दरवाढ झाली. ही संपूर्ण दरवाढ महाविकास आघाडीच्या काळातच झाली आणि आता तेच आमच्यावर आरोप करतात."
"२०१८ मध्ये प्रवाही आणि खाजगी उपसा सिंचनाचे दर वेगवेगळे होते. मात्र २०२२ मध्ये खाजगी उपसासाठी स्वतंत्र दर न देता, प्रवाहीचेच दर लागू करण्यात आले. त्यामुळे ५०० ची वाढ ५००० रुपये झाली. हे पाप महाविकास आघाडी सरकारचे आहे," अशी पोलखोल त्यांनी केली आहे.
तसेच "शेतकर्यांवर कोणताही भूर्दंड पडू नये, म्हणून त्यावर स्थगिती देण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या आठवड्यातच त्यासंदर्भातील कार्यवाही पूर्ण होईल. माझी माध्यमांनाही विनंती आहे की, निवडणुकीत विरोधक फेक नरेटिव्हसाठी बातम्या देत राहतील. पण, त्याची खातरजमा होणे आवश्यक आहे. आता राज्यातील जनतेनेच ठरवावे, सुलतानी सरकार कोणते होते?" असेही ते म्हणाले.