सरंजामशाही वृत्ती पटोलेंच्या रक्तातच! प्रायश्चित्य म्हणून राजीनामा द्यावा
19-Jun-2024
Total Views | 52
मुंबई : सरंजामशाही वृत्तीला प्रोत्साहन देण्याचे गांधी घराण्याचे काम नाना पटोलेंच्या रक्तात भरले आहे. त्याला पुरोगामी महाराष्ट्र थारा देणार नाही. या कृत्याबाबत प्रायश्चित्य म्हणून पटोलेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय कार्यकर्ता धूत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. यावर आता त्यांच्यावर सगळीकडून टीका करण्यात येत आहे.
प्रविण दरेकर म्हणाले की, "नाना पटोले यांनी चिखलात पाय माखल्यानंतर आपल्या कार्यकर्त्याकडून पाण्याने ते धुवून घेतले. हे कृत्य महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासण्यासारखे आहे. अशा सरंजामशाही वृत्तीला प्रोत्साहन देण्याचे गांधी घराण्याचे काम नाना पटोलेंच्या रक्तात भरलेय त्याला पुरोगामी महाराष्ट्र थारा देणार नाही. या कृत्याबाबत प्रायश्चित्य म्हणून पटोलेंनी राजीनामा द्यावा."
"काँग्रेसमध्ये पहिल्यापासून हुजरेगिरीला महत्व होते. परंतू, थोडेसे यश मिळाल्याने हुरळून गेलेल्या नाना पटोलेंचा माज, मगृरी आणि उन्माद या कृत्यातून दिसून येतोय. पाय धुवून घेण्याची त्यांना हौस आहे तर त्यांनी बुवाबाजी करावी. हा झालेला प्रकार दुर्दैवी असून नानांसारख्या प्रवृत्तीला त्यांचेच कार्यकर्ते धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत," असे ते म्हणाले.
"कुठल्याही पक्ष किंवा नेत्याची मस्ती ही कार्यकर्ता उतरवत असतो. ज्यावेळी कार्यकर्त्याला दुर्लक्षित आणि अपमानित केले जाते, अशा प्रकारे हुजरेगिरीने लाचारीने वागवण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा त्या मनोवृत्तीला ठेचून काढण्याची क्षमता, ताकद कार्यकर्त्यात असते. नाना पटोलेंना त्यांच्या मगृरीचा जाब कार्यकर्ताच विचारेल. येणाऱ्या काळात पक्षात आणि भविष्यात येणाऱ्या निवडणुकांत दिसून येईल," असेही दरेकर म्हणाले.