ओटावा : कॅनडा सरकारचा दुटप्पी चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. एकीकडे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो जी-७ दरम्यान पंतप्रधान मोदींना भेटून दोन्ही देशांमधील सहकार्याबाबत बोलतात, तर दुसरीकडे खलिस्तानी दहशतवाद्यांबाबत त्यांचा दृष्टिकोन बदलताना दिसत नाही. वर्षभरापूर्वी कॅनडात मारला गेलेला खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याला कॅनडाच्या संसदेत केवळ श्रद्धांजलीच वाहण्यात आली नाही, तर त्याच्या स्मरणार्थ २ मिनिटे मौन पाळून आदरांजली वाहण्यात आली.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी कोणत्याही ठोस पुराव्याविना हरदीपसिंग निज्जरची हत्या भारत सरकारच्या प्रतिनिधींनी केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, खलिस्तान समर्थकांनी व्हँकुव्हर येथील भारतीय दूतावासाबाहेर रॅली काढून निदर्शने केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कॅनडाच्या संसदेने दि. २३ जून रोजी कनिष्क विमान दुर्घटनेला ३९ वर्षे पूर्ण होत असताना खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरला दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. कनिष्क विमानात स्फोट झाला, ज्याचा ठपका खलिस्तानी दहशतवाद्यांवर ठेवण्यात आला होता.
कॅनडाच्या इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानल्या जाणाऱ्या या स्फोटात कॅनडाच्या नागरिकांचाही मृत्यू झाला होता. असे असतानाही कॅनडा खलिस्तानी घटकांना आश्रय देत नाही तर त्यांना प्रोत्साहनही देत आहे. आज खलिस्तानी घटकांनी कॅनडाच्या राजकारणावर लक्षणीय पकड ठेवण्यास सुरुवात केली आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरला गेल्या वर्षी दि. १८ जून रोजी गुरुद्वाराच्या पार्किंगमध्ये हल्लेखोरांनी गोळ्या घालून ठार केले होते. हरदीप सिंग कॅनडातील व्हँकुव्हर शहरात असलेल्या गुरुद्वाऱ्याचा अध्यक्ष होता.