केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतला मणिपूरच्या स्थितीचा आढावा
17-Jun-2024
Total Views |
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मणिपूरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली. मणिपूरचे राज्यपाल अनुसुईया उईके यांनी गृहमंत्र्यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतल्याच्या एका दिवसानंतर ही बैठक झाली. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी मणिपूर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.
दरम्यान, काही महिन्यांपुर्वी झालेल्या मणिपूरमधील हिंसाचारानंतर राज्यात अस्थिरतेचे चित्र पाहायला मिळाले होते. याच हिंसाचारानंतर स्थानिकसह राष्ट्रीय राजकारणदेखील तापले होते. विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मणिपूरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक झाली. गेल्या वर्षी मे महिन्यापासून कुकी आणि मेईतेई या दोन समुदायांमध्ये संघर्ष सुरू आहे.
केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला, इंटेलिजन्स ब्युरोचे प्रमुख तपन डेका, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, लष्करप्रमुख (भावी) लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी, जीओसी थ्री कोअर एचएस साही, मणिपूरचे सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंग, मणिपूरचे मुख्य सचिव विनीत जोशी, मणिपूरचे पोलिस महासंचालकत राजीव राजीव सिंग आणि आसाम रायफल्सचे महासंचालक प्रदीप चंद्रन नायर दिल्लीतील नॉर्थ ब्लॉकमध्ये गृह मंत्रालयाच्या बैठकीत सामील झाले होते.