"आपल्याला यापुढे IMF समोर हात पसरवण्याची गरज राहणार नाही"; भुकेकंगाल पाकच्या पंतप्रधानांचे जनतेला आश्वासन
17-Jun-2024
Total Views | 43
इस्लामाबाद : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF), यूएई, सौदी अरेबिया, अमेरिका, चीन यांसारख्या देशांच्या कर्जामुळे पाकिस्तानला श्वासही घेता येत नाही, तरीही तेथील राज्यकर्ते जनतेला मोठमोठी आश्वासने देताना मागे हटत नाहीत. गेल्या दीड वर्षांपासून सत्तेत असलेले पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानची अर्थव्यवस्था लवकरच सुधारेल, असे स्वप्न पाकिस्तानी जनतेला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पाकला यापुढे कर्जाची गरज भासणार नाही, पण त्याआधी शेवटच्या वेळेसाठी आयएमएफ कडून कर्ज घ्यावे लागेल.
आजघडीला पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. पाक रुपयाची बिकट अवस्था झालेली आहे. देश कर्जाखाली दबला आहे. आयात करण्यासाठी परकीय चलन नाही, पण आयएमएफकडून घेतलेल्या कर्जामुळे पाकिस्तानची गरिबी दूर होईल, असे सांगून शाहबाज शरीफ पाकिस्तानच्या जनतेला भरोसा देण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सरकार पाकिस्तानची अर्थव्यवस्था एवढी मजबूत करेल की पुन्हा कधीही आयएमएफ कडून कर्ज घ्यावे लागणार नाही, अशी ग्वाबी शाहबाज यांनी पाक जनतेला दिली आहे.
शाहबाज यांच्या सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ते सरकारी टीव्ही चॅनलवर देशातील जनतेला संबोधित करत होते आणि त्यानंतर त्यांनी हा दावा आणि आश्वासन दोन्ही केले. शरीफ म्हणाले की, आम्हाला आशा आहे की हे बेलआउट पॅकेज पाकिस्तानच्या इतिहासातील शेवटचे पॅकेज असेल. आपल्या मंद अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पाकिस्तान सरकार आयएमएफकडून आणखी एक बेलआउट पॅकेज घेण्याबाबत चर्चा करत आहे. हे पॅकेज ६ ते ८ अब्ज डॉलर्सचे असू शकते.
नुकत्याच झालेल्या पाकिस्तानी अर्थसंकल्पातही पाकिस्तानने आयएमएफच्या अटींनुसार धोरणे बनवण्याचा प्रयत्न केला होता. ते म्हणाले, इंशाअल्लाह, पाकिस्तानच्या इतिहासातील हे शेवटचे बेलआउट पॅकेज असेल. पाक पंतप्रधान म्हणाले की ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपल्या सर्वांना आपल्या देशाच्या फायद्यासाठी समस्यांना तोंड द्यावे लागेल. हा मार्ग अवघड आहे, आमचे सरकार हा बदल करण्यास तयार आहे. जे लोकांसाठी कोणतेही काम करत नाहीत आणि देशावर ओझ्यासारखे आहेत त्या सर्व संस्था, विभाग आणि मंत्रालये आम्ही बंद करू, असे शरीफ म्हणाले. आपल्या 100 दिवसांच्या सरकारच्या कामांची माहिती देताना शरीफ यांनी दावा केला की, दि. ४ मार्च रोजी ते सत्तेत आल्यापासून महागाईचा दर ३८ टक्क्यांवरून १२ टक्क्यांवर आला आहे.