रेमल चक्रीवादळाचा प्रकोप! अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे ३८ जणांचा मृत्यू

ईशान्येकडील राज्यांना सर्वाधिक फटका

    30-May-2024
Total Views |
 Cyclone
 
नवी दिल्ली : रेमल चक्रीवादळामुळे ईशान्येकडील जवळपास सर्वच राज्ये प्रभावित झाली आहेत. रेमल चक्रीवादळच्या प्रभावामुळे चार राज्यांमध्ये अतिवृष्टी आणि भूस्खलनात किमान ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यासोबतचं ईशान्येतील आठही राज्यांतील रस्ते आणि रेल्वे संपर्कावरही परिणाम झाला आहे. रेमल चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा मिझोराम राज्याला बसला आहे. मिझोराममध्ये २९ लोकांचा मृत्यू झाला आहे.
 
मिझोराममधील आयझॉल जिल्ह्यात खाण कोसळून २५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर नागालँडमध्ये चार, आसाममध्ये तीन आणि मेघालयमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. जोरदार वाऱ्यासह पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झाले, झाडे उन्मळून पडली आणि वीज आणि इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे. चक्रीवादळाचा फटका रेल्वे सेवेलाही बसला आहे. अनेक ट्रेन रद्द करण्यात आल्यात किंवा उशिराने धावत आहेत.
 
  
आपत्ती व्यवस्थापन आणि पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आयझॉलमधील मेल्थम आणि हिलिमेन दरम्यानच्या खाणीच्या जागेवरून आतापर्यंत २५ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर अनेक जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. जिल्ह्यातील सालेम, ऐबक, लुंगसेई, केलसिह आणि फाल्कन येथे भूस्खलनामुळे सहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता आहेत. नागालँडमधील विविध घटनांमध्ये किमान चार जणांचा मृत्यू झाला आहे. इंफाळ नदीला पुर आल्यामुळे अनेक भाग पाण्याखाली गेले होते. शेकडो घरांमध्ये पाणी शिरले. लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी मदत कार्य चालू आहे.