प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादाने पंतप्रधान मोदींच्या विजयाची गुढी उभारणार!
देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
09-Apr-2024
Total Views | 35
मुंबई : "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात संपूर्ण जग आज नवा भारत पाहत आहे. मला पूर्ण विश्वास आहे, की प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादाने देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या विजयाची गुढी आपण उभारणार आहोत. विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी मोदींच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहावे", असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, दि. ९ एप्रिल रोजी केले.
नागपुरात गुढी पाडाव्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, यंदाचा गुढीपाडवा हा खऱ्या अर्थाने महत्त्वापूर्ण गुढीपाडवा आहे. कारण, ५०० वर्षांच्या संघर्षानंतर प्रभू श्री राम अयोध्येतील राम मंदिरात विराजमान झाले. जेव्हा प्रभू श्रीरामांनी रावणावर विजय मिळवला, त्यावेळी आपण दिवाळी साजरी केली आणि गुढीही उभारली.
मात्र, त्यानंतर आमचे श्रीराम वर्षानुवर्षे अज्ञातवासात, वनवासात होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात २२ जानेवारी रोजी प्रभू श्रीराम आपल्या मूळ स्थानी अयोध्येत विराजमान झालेले पाहून अतिव आनंद झाला. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने सांस्कृतिक पुनर्जागरणाच्या नवीन पर्वाला आज सुरुवात झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.
सांस्कृतिक पुनर्जागरणाचे पर्व
सांस्कृतिक पुनर्जागरणाच्या या नव्या पर्वात आता नवीन पिढीला आपण जाज्ज्वल्य इतिहास, संस्कृती आणि समृद्ध अशी परंपरा सुपूर्द करायची आहे. मोगलांनी, इंग्रजांनी लिहिलेला इतिहास नाही तर जगाच्या पाठीवरचा सगळ्यात जुना आणि वैभवशाली इतिहास आपल्याला सांगायचा आहे. कधीकाळी इतिहास आणि संस्कृतीतून डिलीट केलेली पाने आता नव्याने लिहायची आहेत. आम्ही कधीही पराजित मानसिकतेतले लोक नव्हतो, तर वर्षानुवर्षे ज्यांनी जगाला मार्गदर्शन केले, अशा भारतीय संस्कृतीतील सनातनी हिंदू लोक आहोत, हे सांगण्याची वेळ आता आली आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.