राऊत, 'हे' युतीधर्माला शोभतं का? विशाल पाटलांचा सवाल
08-Apr-2024
Total Views | 52
सांगली : काहीतही संशय निर्माण करुन विश्वजीत कदम यांच्याविरोधात बोलणं हे युतीधर्माला शोभतं का? असा सवाल काँग्रेसचे सांगलीतील उमेदवारीचे दावेदार विशाल पाटील यांनी संजय राऊतांना केला आहे. महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून सध्या उबाठा गटात आणि काँग्रेसमध्ये वाद सुरु आहे. दरम्यान, आता विशाल पाटील यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या उमेदवारीचा दावा केला आहे.
विशाल पाटील म्हणाले की, "विश्वजीत कदम यांच्या नेतृत्त्वातील एकच उमेदवार माझ्या रुपाने दिल्लीला पाठवला होता. पण अनपेक्षितरित्या जागावाटपाचा तिढा मध्येच आला असून आम्हाला या सगळ्याची अपेक्षा नव्हती. तरीसुद्धा तुम्ही का जागा मागितली, या वादात न पडता आमच्या सर्व जिल्हा नेत्यांनी एक संयम पाळला. आम्ही कुठलंही वक्तव्य केलं नाही."
"मात्र, गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये सांगलीविषयी खूप मोठी चर्चा होताना दिसत आहे. संजय राऊत हे शिवसेनेचा आवाज आहे. पण जो आवाज त्यांना सांगलीकरांनी दिला तोच आवाज सांगलीत येऊन त्यांच्याविरोधात वापरला गेला. विश्वजीत कदम हे सांगलीच्या जनतेचं म्हणणं मांडत होते. मात्र, यावेळी काहीतही संशय निर्माण करुन त्यांच्याविरोधात बोलणं हे युती धर्माला शोभेसं नाही," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "ही उमेदवारी कदाचित उद्या जाहीर होईन आणि ती आमच्या बाजूनेच होईल असा आम्हाला विश्वास आहे. पण हा निर्णय व्हायच्या आधी राऊतांनी सांगलीत येण्याचं कारण काय? राज्यात निवडणूक लागली आहे. त्यातील दोन-तीन दिवस इथे येऊन त्यांनी का वाया घालवावे, हे कोडं अजूनही आम्हाला सुटलेलं नाही. पण ते आता येऊन गेल्यानंतर त्यांनासुद्धा सांगलीच्या जनतेला काय हवं आहे, याचा अंदाज आला असेल. सांगली नेमकी कुणाची आहे? याचं उत्तर राऊतांना जनतेने दिलं असावं," असेही ते म्हणाले.