धाराशिव : राज्यात सर्वत्र लोकसभा निवडणूकांची धामधूम सुरु असताना महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. उद्धव ठाकरे गटाचे धाराशिव लोकसभेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या उमेदवारी अर्जात त्रुटी आढळल्याने तो रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महाविकास आघाडीचे धाराशिव लोकसभेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी मंगळवार, १६ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि शरद पवार गटाचे नेते रोहित पवार हे उपस्थित होते. यावेळी अदित्य ठाकरेंनी ओमराजे निंबाळकरांचा 'जिगर का टुकडा' असा उल्लेख केला होता. मात्र, आता त्यांचा अर्ज रद्द होणार असल्याचे बोलले जात आहे.
ओमराजे निंबाळकर यांच्या एबी फॉर्म आणि मालमत्ता प्रमाणपत्रामध्ये चुका आढळून आलेल्या आहेत. या चूका दुरुस्त करण्यासाठी त्यांना १९ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या वेळेत त्यांच्या चूका दुरुस्त न झाल्यास त्यांचा अर्ज रद्द होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या अर्जातही त्रुटी आढळल्याचे सांगण्यात येत आहे.