मुंबई (विशेष प्रतिनिधी): सद्यस्थितीत भारतात ७,३९६ इतकी वानरे (Golden langur) आहेत असे नुकतेच एका सर्वेक्षणामधून उघड झाले आहे. हे सर्वेक्षण दोन टप्प्यांमध्ये केलं गेलं असून प्रिमेट रिसर्च सेंटर एनई इंडिया, आसाम वनविभाग आणि सलीम अली सेंटर फॉर ऑर्निथोलॉजी अँड नॅचरल हिस्ट्री आणि कॉन्झरवेशन हिमालयाज यांच्या माध्यमातून करण्यात आले.
ही वानरे (Golden langur) आययुसीएनच्या धेक्याच्या (Endangered) श्रेणीमध्ये येतात. मार्च-एप्रिल २०२० मध्ये झालेल्या या सर्वेक्षणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये मानस बायोस्फीअर रिझर्व्हच्या पश्चिमेकडील भागाबरोबरच रिपू राखीव जंगलांचा ही समावेश आहे. तर, दुसऱ्या टप्प्यात मार्च एप्रिल २०२१ मध्ये पश्चिम आसाममधील बोंगाईगाव, कोक्राझार आणि धुबरी जिल्ह्यातील वानरांच्या अधिवासावर लक्ष केंद्रित करण्यात आले. यावेळी प्रथमच ब्लॉक काऊंट मेथड या पद्धतीचा वापर करण्यात आला.
आययुसीएनच्या २०१५ च्या मुल्यांकनानुसार साधारण ६००० ते ६५०० इतकी वानरांची संख्या होती. आत्ताच्या नवीन सर्वेक्षणाची आकडेवारी वानरांच्या संख्येमध्ये वाढ दाखवत असली तरीही अद्याप वानरे धोक्याच्या श्रेणीमध्येच आहेत.