पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते पक्षात नाराज असल्याचे सांगण्यात येत होते. याशिवाय त्यांनी मंगळवारी सकाळीच फेसबूकवर एक भावनिक पोस्टही शेअर केली होती. दरम्यान, आता त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
हे वाचलंत का? - "महाविकास आघाडी व्हेंटिलेटरवर! मोठा गँगवॉर सुरु!"
वसंत मोरे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, वसंत मोरेंच्या राजीनाम्यामुळे मनसेला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. मोरेंनी सकाळी फेसबुकवर एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. "एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो. त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो, ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो," असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते.
त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा एक पोस्ट शेअर करत पक्षाचा राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले आहे. "अलिकडच्या काळात पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्याविरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण आणि पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह अतिशय वेदनादायी आहे," असे म्हणत त्यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. दरम्यान, वसंत मोरे आता शरद पवार गट किंवा ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.