राज ठाकरेंनी बोलवलं तरीही परत जाणार नाही : वसंत मोरे
12-Mar-2024
Total Views | 93
पुणे : मनसे नेते वसंत मोरे यांनी पक्षाचा राजीनामा दिला असून राज ठाकरेंनी बोलवलं तरी परत जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर वसंत मोरेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांबाबत अनेक खुलासे केलेत.
वसंत मोरे म्हणाले की, "आज मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्यत्वाचा आणि माझ्याकडे असलेल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. गेल्या वर्षभरापासून मी पुणे शहरात लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक आहे. पण माझ्या शहरातील काही पदाधिकारी कधीही इच्छूक नसताना निवडणुक जवळ आल्यावर इच्छूकांची यादी वाढत गेली. राज ठाकरेंनी सगळ्या लोकसभा मतदारसंघांचे अहवाल मागवले होते. यामध्ये पुणे शहराची जबाबदारी असलेल्या लोकांनी या अहवालात शहरात मनसेची स्थिती अतिशय नाजूक असल्याची माहिती जाणुबूजून राज ठाकरेंपर्यंत पोहोचवली."
"तेव्हापासूनच पुणे शहरात मनसे लोकसभा निवडणुक लढवू शकत नाही, असा दृष्टीकोन निर्माण झाला. मी एकनिष्ठ असूनही वारंवार माझ्यावरच अन्याय होत आहे. मी ज्या लोकांसोबत पुणे शहरात माझ्या राजकीय जिवनातील १५ वर्षे घालवली, तेच पदाधिकारी मला तिकीट मिळू नये यासाठी नकारात्मक अहवाल पाठवत आहेत. त्यामुळे अशा लोकांबरोबर काम करणं मला जमणार नसल्याने मी सगळ्या पदांचा राजीनामा देत स्वत:च्या हाताने परतीचे दोर कापले आहे," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "मी वारंवार या सगळ्या गोष्टी नेत्यांपर्यंत पोहोचवल्या पण त्यांना त्या कळल्या नाहीत. पुणे शहरात लोकसभा लढवण्याबाबत चर्चा करण्यासाठी मी राज ठाकरेंकडेसुद्धा वेळ मागितली होती. परंतू, तेसुद्धा यासंदर्भात बोलले नाहीत. माझा वाद कधीही राज साहेबांसोबत किंवा मनसेसोबत नव्हता. परंतू, ज्या चुकीच्या लोकांच्या हातात हे शहर दिलं आहे त्यांच्याशी माझा वाद आहे. यापुढे मला बोलवलं तरीही मी जाणार नाही. मी माझे परतीचे सगळे दोर कापलेले आहेत. मी कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत परत जाणार नाही. येणाऱ्या दोन-तीन दिवसांत मी माझी भुमिका जाहीर करेन," असेही ते म्हणाले.