"शिल्लक सेनेच्या प्रमुखांना उमेदवार जाहीर करण्याचा अधिकार कोणी दिला" - काँग्रेसच्या 'या' बड्या नेत्याचा ठाकरेंना सवाल
10-Mar-2024
Total Views | 244
मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्यासाठी आठवड्यापेक्षाही कमी काळ शिल्लक राहिला असताना, जागावाटपावरुन महाविकास आघाडीमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे. उबाठा गटाचे गटप्रमुख उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार म्हणून अमोल किर्तीकर यांचे नाव जाहीर केले.
उद्धव ठाकरेंनी अमोल किर्तीकर यांचे नाव जाहीर करताच, काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी ट्विट करत अत्यंत शेलक्या शब्दात टीका केली त्यांनी उद्धव ठाकरेंना उमेदवार जाहीर करण्याचा अधिकार कोणी दिला असा प्रश्न विचारला. ते म्हणाले की, "काल संध्याकाळी शिल्लक सेनेच्याप्रमुखांनी अंधेरी येथील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवार घोषित केला. रात्रीपासून मला फोन येत आहेत.हे कसे होऊ शकते?"
पुढे बोलताना ते म्हणाले की, " महाविकास आघाडीच्या डझनभर बैठका होऊनही जागावाटपाचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. ही जागाही प्रलंबित असलेल्या ८-९ जागांपैकी एक आहे, असे मला जागावाटपच्या बैठकीमध्ये सहभागी झालेल्या काँग्रेसच्या सहकाऱ्यांनी सांगितले आहे. मग शिवसेनेचा उमेदवार जाहीर करणे हे युती धर्माचे उल्लंघन नाही का? की काँग्रेसला नामोहरम करण्यासाठी असे कृत्य जाणीवपूर्वक केले जात आहे?" असा प्रश्नही संजय निरुपम यांनी उपस्थित केला.
या प्रकरणात त्यांनी काँग्रेस नेतृत्वाकडे हस्तक्षेप करण्याची सुद्धा मागणी केली आहे. संजय निरुपम एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी अमोल किर्तीकर यांच्यावर खिचडी घोटळ्यात सहभागी असल्याचा आरोप देखील केला. ते म्हणाले की, "शिवसेनेने कोणाचे नाव सुचवले आहे? तो खिचडी घोटाळ्यातील घोटाळेबाज असून त्याने खिचडी पुरवठादाराकडून चेकने लाच घेतली आहे."
निरुपम यांनी अमोल किर्तीकरांनी ज्या घोटाळ्यात लाच घेतली तो घोटाळा काय होता याची माहिती सुद्धा ट्विटमध्ये दिली. ते म्हणाले की,"कोविडच्या काळात, मुंबई महानगर पालिकेने स्थलांतरित मजुरांना मोफत अन्न पुरवण्याचा एक स्तुत्य कार्यक्रम सुरु केला होता. उबाठा गटाच्या प्रस्तावित उमेदवाराने गरिबांना जेवण देण्याच्या योजनेतून कमिशन घेतले आहे. ईडी संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे.काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते अशा घोटाळेबाज उमेदवाराचा प्रचार करतील का?"