कोलकाता : हल्दवानी येथील बनभुलपुरा हिंसाचारातील मास्टरमाईंड अब्दुल मलिकच्या अटकेनंतर आता त्याचा मुलगा अब्दुल मोईदलाही अटक करण्यात आली आहे. उत्तराखंड पोलिसांनी मोईदला दिल्लीतून अटक केली आहे. अब्दुल मलिकच्या चौकशीदरम्यान त्याच्या लोकेशनची माहिती मिळाली, त्यानंतर उत्तराखंड पोलिसांच्या अनेक पथकांनी छापे टाकले. अचूक माहितीच्या आधारे मोईदला दिल्लीतून पकडण्यात आले.
बनभूलपुरा हिंसाचारात तो टॉप ८ वाँटेडमध्ये होता. आता पोलिसांनी या हिंसाचाराशी संबंधित सर्व बड्या चेहऱ्यांना अटक केली आहे. नैनितालचे एसएसपी प्रल्हाद नारायण मीणा यांनी सांगितले की, बनभूलपुरा हिंसाचाराशी संबंधित हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांची सहा पथके तयार करण्यात आली होती, जी देशातील विविध राज्यांमध्ये - गुजरात, दिल्ली, मुंबई-महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार इत्यादी ठिकाणी सतत कार्यरत होती.
यातील एका पथकाने हल्दवानी दंगलीतील वॉन्टेड आरोपी अब्दुल मोईदला दिल्लीतून अटक केली आहे. अब्दुल मोईद सलग २१ दिवस पोलिसांना चकमा देत होता, मात्र आता तो पोलिसांच्या ताब्यात आहे. हल्दवानी हिंसाचारातील मुख्य आरोपी अब्दुल मलिकला दि. २४ फेब्रुवारी २०२४ रोजी दिल्लीतून अटक करण्यात आली होती. माहितीच्या आधारे नैनिताल पोलिसांच्या पथकाने त्याला अटक केली होती. अब्दुल मलिकला अटक केल्यानंतर त्याला हल्दवानी येथे आणण्यात आले.
पोलिस कोठडीत त्याची चौकशी सुरू आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली असून, त्यानंतर त्याच्याकडून माहिती काढली जात आहे. अब्दुल मलिक यांना १५० हून अधिक प्रश्न विचारण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दि. ८ फेब्रुवारी रोजी हल्दवानीतील बांभूलपुरा येथे बेकायदेशीर मशीद-मदरसा हटवण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकावर आणि पोलिसांवर हल्ला करण्यात आला होता.
यात अब्दुल मलिक आणि अब्दुल मोईद यांच्या भूमिका समोर आल्या. त्याच्यावर दंगलखोरांना भडकावल्याचा आरोप आहे. मलिक का बगीचा परिसरातून सुरू झालेल्या हिंसाचारात सहा जणांचा मृत्यू झाला होता. त्याचवेळी दगडफेकीत सिटी मॅजिस्ट्रेट रिचा सिंग, रामनगर कोतवाल यांच्यासह ३०० हून अधिक पोलीस आणि महामंडळाचे कर्मचारी जखमी झाले. कट्टरवाद्यांनी बनभूलपुरा पोलिस स्टेशनही जाळले. पोलिस जीप, जेसीबी, फायर इंजिन, दुचाकीसह ७० हून अधिक वाहने जळून खाक झाली.
याप्रकरणी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दंगलखोरांना पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश दिले होते. हल्द्वानीमध्ये संचारबंदी लागू करून हिंसाचाराच्या घटनांवर नियंत्रण आणता आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हल्दवानी हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी नोंदवलेल्या प्रकरणात आतापर्यंत ८५ हून अधिक आरोपींना अटक करण्यात आली आहे. हल्दवानी हिंसाचार प्रकरणानंतर पोलीस आणि प्रशासनाच्या पथकाच्या पातळीवर सातत्याने कारवाई सुरू आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी पकडले गेले आहेत.