बंगालमध्ये काँग्रेसला भगदाड! 'या' नेत्याने दिला राजीनामा
29-Feb-2024
Total Views | 101
कोलकाता : लोकसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला आणखी एक झटका बसला आहे. काँग्रेस नेते कौस्तव बागची यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपल्या राजीनाम्याची माहिती एक्सवर एक पोस्ट शेयर करत दिली. कौस्तव बागची यांनी आपला राजीनामा सोशल मीडियावर शेअर करून पक्षावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
पक्षात योग्य सन्मान न मिळाल्याने त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी आणि सरचिटणीस गुलाम अहमद मीर यांच्याकडे पाठवला आहे. बागची यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, "कदाचित आता लोक मला पक्षविरोधी म्हणतील, परंतु मी एक गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत आहे की मी भ्रष्ट टीएमसीशी हातमिळवणी करण्याच्या काँग्रेसच्या विरोधात आहे."
पुढे बोलताना ते म्हणाले की, "काँग्रेसचे हायकमांड पश्चिम बंगालमधील काँग्रेसला महत्त्व देत नाही. त्यामुळे मला माझ्या स्वाभिमानाशी तडजोड करून पक्षात राहायचे नाही." कौस्तव बागची यांचे राजकारण आजपर्यंत ममता बॅनर्जी यांच्याविरोधातच राहिले आहे. कौस्तव बागची यांनी याआधी ममता बॅनर्जी यांच्याविरोधात कठोर भूमिका घेतलेली आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात टिप्पणी केल्यामुळ त्यांना अटक करण्यात आली होती. गेल्या वर्षी मार्चमध्ये जामिनावर सुटल्यानंतर कौस्तव बागचीनी ममता बॅनर्जी सरकारच्या निषेधार्थ मुंडन केले होते. ममता बॅनर्जी यांच्याविरोधात इतकी कठोर भूमिका घेतल्यानंतर काँग्रेसचे दिल्लीतील हायकमांड ममता यांच्या टीएमसीसोबत बंगालमध्ये आघाडी करण्याच्या विचारात आहे.
लोकसभेच्या ४२ जागा असलेल्या पश्चिम बंगालमध्ये ममता काँग्रेसला ५ जागा देण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधील काँग्रेसचे स्थानिक नेते नाराज आहेत.