हिमाचलमध्ये काँग्रेसला सुरुंग लावणारे! कोण आहेत विक्रमादित्य सिंह?
28-Feb-2024
Total Views | 50
शिमला : हिमाचल प्रदेशातील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर कॅबिनेट मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी सुखविंदर सिंह सुक्खू सरकारमधील मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. दि. २८ फेब्रुवारी २०२४, बुधवारी सकाळी त्यांनी पत्रकार परिषदेत मंत्रिमंडळाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली. त्यांच्या राजीनाम्यानंतर हिमाचलमधील काँग्रेस सरकार कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दि. २७ फेब्रुवारी २०२४ राज्यसभा निवडणुकीदरम्यानच काँग्रेसच्या सहा आमदरांनी क्रॉस वोटिंग केले होते. तेव्हापासून सुक्खू यांच्या सरकारवर संकट आलेले आहे. हिमाचल प्रदेशच्या विधानसभामध्ये ६८ आमदार आहेत. ४० आमदारांसह काँग्रेस पहिल्या क्रमाकावर आहे. तर दुसऱ्या क्रमाकावर असलेल्या भाजपकडे २४ आमदार आहेत. यासह हिमाचल प्रदेशमध्ये चार अपक्ष आमदार आहेत.
काल झालेल्या राज्यसभा निवडणुकीत हिमाचलमधून एक खासदार राज्यसभेवर जाणार होता. राज्यसभा निवडणुक जिंकण्यासाठी ३५ मतांची गरज होती. काँग्रेसकडे संख्याबळ असताना सुद्धा त्यांचे अधिकृत उमेदवार अभिषेक मनु सिंघवी यांचा पराभव झाला.
काँग्रेसच्या सहा आमदारांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केले. त्यामुळे अभिषेक मनु सिंघवी आणि भाजपच्या उमदेवार दोघांनाही ३४-३४ मत मिळाली. शेवटी लॉटरी काडून भाजपच्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यात आले. त्यातच आता विक्रमादित्य सिंह यांच्या राजीनाम्यामुळे हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोण आहेत विक्रमादित्य सिंह?
विक्रमादित्य सिंह हे सध्या हिमाचल सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री होते. ते सध्या सिमला ग्रामीण मतदारसंघातून विधानसभेचे सदस्य आहेत. विक्रमादित्य सिंह यांना मोठा राजकीय वारसा लाभलेला आहे. विक्रमादित्य यांचे वडिल वीरभद्र सिंह हे हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. तर त्यांची आई प्रतिभा सिंह मंडी लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत.
विक्रमादित्य सिंग हे राजघराण्याशी संबंधित आहेत. त्यांनी शिमला येथील बिशप कॉटन स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. याशिवाय त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे. विक्रमादित्य सिंह अयोध्येतील राम लला प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी झाले होते. तेव्हापासूनच विक्रमादित्य काँग्रेसच्या हायकमांडवर नाराज असलेच्या चर्चा सुरू होत्या. त्यांची पुढील राजकीय खेळी काय असेल याबाबत त्यांनी काहीही माहिती दिलेली नाही.