"काँग्रेसच्या युवराजांनी जाहीरपणे..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विरोधकांना आव्हान
08-Nov-2024
Total Views | 69
नाशिक : काँग्रेसचे युवराज आणि त्यांच्या नेत्यांनी वीर सावरकरांचा त्याग आणि बलिदानाची दररोज कमीत कमी १५ मिनीटे प्रशंसा करून दाखवावी, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना दिले आहे. शुक्रवार, दिं. ८ नोव्हेंबर रोजी महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ नाशिक येथे सभापंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "आमच्या केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. आम्ही छत्रपती शिवाजी महारांचा सन्मान पुढे नेला. वीर सावकर आमचे प्रेरणास्त्रोत आहेत, हे आम्ही गर्वाने सांगतो. वीर सावरकर महाराष्ट्राचे गौरव आहेत. पण काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या लोकांनी कधीच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळू दिला नाही. काँग्रेसचे लोक कायम वीर सावरकरांचा अपमान करतात. महाराष्ट्रात येऊन त्यांचा अपमान करतात. काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या मित्रांना माझं आव्हान आहे की, त्यांनी काँग्रेसचे युवराज आणि त्यांच्या नेत्यांनी वीर सावरकरांचा त्याग आणि बलिदानाची दररोज कमीत कमी १५ मिनीटे प्रशंसा करून दाखवावी, एकही जण ती हिंमत करणार नाही."
"देश आणि महाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेब ठाकरेंचे योगदान अतुलनिय आहे. परंतू, काँग्रेसच्या नेत्यांच्या तोंडातून त्यांच्या प्रशंसेसाठी एकही शब्द निघत नाहीत. काँग्रेसच्या युवराजांनी सार्वजनिकरित्या बाळासाहेबांची प्रशंसा करावी, असे माझे त्यांना आव्हान आहे. आज ८ नोव्हेंबर आहे. मी प्रत्येक दिवस मोजणार आहे आणि महाविकास आघाडीचे लोक बाळासाहेब आणि वीर सावरकरांची प्रशंसा करतात की, नाही याची वाट पाहणार आहे," असे ते म्हणाले.
महायूतीचे घोषणापत्र, तर मविआचे घोटाळापत्र!
"महाराष्ट्रात एकीकडे महायूतीचे घोषणापत्र आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे घोटाळापत्र आहे. जिथे काँग्रेस आणि त्यांचे साथीदार असतील तिथे घोटाळा होणार, हे पक्के आहे. ते अशाच योजनांची घोषणा करतात ज्यातून जास्तीत जास्त भ्रष्टाचार होऊ शकेल. महाराष्ट्रात या लोकांना पुन्हा एकदा हे पाप करू देऊ नका. संपुर्ण देशाने काँग्रेसच्या वागणूकीमुळे त्यांना नाकारले आहे. आता काँग्रेस ऑल इंडिया काँग्रेस राहिली नसून परजीवी काँग्रेस बनली आहे. काँग्रेस पक्ष फक्त आपल्या साथीदारांवर अवलंबून आहे. आज महाराष्ट्रातील प्रत्येकजण भाजपा आणि महायूती आहे तर गती आहे आणि महाराष्ट्राची प्रगती आहे, हेच सांगत आहे," असेही ते म्हणाले.