गेल्या ३ दशकांतील सर्वाधिक मतदान! राज्यात ६५.११% मतदानाची नोंद
21-Nov-2024
Total Views | 78
मुंबई : (Maharashtra) महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी २८८ विधानसभा मतदारसंघात मतदान पार पडले. मतदानाच्या दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६४.५८% मतदान नोंदवण्यात आले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या मतदानामुळे हा आकडा वाढला असून सुधारित आकडेवारीनुसार राज्यात एकूण ६५.११% मतदान झाल्याची नोंद आहे. ही आकडेवारी पाहता ६६ टक्क्यांचा आकडा ओलांडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच गेल्या ३० वर्षांमध्ये पहिल्यांदाच राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
२०१९ ची विधानसभा निवडणूक व सहा महिन्यांपूर्वी झालेली लोकसभा निवडणूक या दोन्हींच्या तुलनेत या निवडणुकीत मतांची टक्केवारी वाढल्याचे चित्र दिसत आहे. मतदानाची वाढलेली ही आकडेवारी निवडणुकीच्या निकालाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरु शकते. अलीकडच्या काही वर्षांमध्ये राज्यात कधीच ६५ टक्क्यांहून अधिक मतदान झाले नव्हते. १९९५ साली ७१.६९% मतदानाची नोंद झाली होती. होती.दरम्यान, २०१९ मध्ये राज्यात ८.८५ कोटी नोंदणीकृत मतदार होते. त्यात गेल्या पाच वर्षांमध्ये ९.५% वाढ झाली असून राज्यात आता ९.६९% मतदार आहेत.
राज्यात कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक ७६.२५% मतदान झाल्याची नोंद आहे. तर मुंबई शहरात सर्वाधिक कमी ५२.०७% मतदान झाल्याचे समोर आले आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर या चार मोठ्या शहरांमध्ये मतदानाच्या टक्केवारीत वाढ व्हावी, यासाठी निवडणूक आयोगाने विशेष प्रयत्न केले होते. मात्र त्या प्रयत्नांना फारसे यश आले नसल्याचे पाहायला मिळाले. कल्याण पश्चिम मतदारसंघात सर्वात कमी ४१% मतदान हे झाले आहे. मंत्रालय व विधानभवन असलेल्या कुलाबा मतदारसंघांत केवळ ४५ टक्केच मतदान झाले आहे.
कोल्हापूर राज्यात अव्वल
विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक ७६.१७% इतके मतदान झाले आहे. त्यामुळे कोल्हापूर राज्यात अव्वल ठरला असून दुसरीकडे मतदारसंघांमध्येही कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर मतदारसंघ राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. येथे ८४.७९% मतदान झाले. विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीतही करवीर मतदारसंघ अव्वल ठरला होता. यंदाच्या निवडणुकीत कागल मतदारसंघ दुसऱ्या स्थानावर असून, तेथे ८३% इतके मतदान झाले आहे.