"जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते त्यावेळी..."; उपमुख्यमंत्री फडणवीसांचं विधान
21-Nov-2024
Total Views |
नागपूर : राज्यभरात बुधवारी विधानसभा निवडणूकीसाठी मतदान पार पडले. यावेळी संपूर्ण राज्यात मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसले. दरम्यान, जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते त्यावेळी भाजप आणि मित्रपक्षाला त्याचा फायदा होतो, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी वाढली आहे. जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते त्यावेळी भाजप आणि मित्रपक्षाला त्याचा फायदा होतो, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे आम्हाला निश्चितपणे याचा फायदा होईल आणि महाराष्ट्रात आमचे सरकार तयार होईल, अशी आमची अपेक्षा आहे. ज्याप्रकारे मतदानाची टक्केवारी वाढली आहे त्यामुळे लोकांना सरकारबद्दल आपुलकी वाटत असल्याचा याचा अर्थ होतो," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "प्राथमिकदृष्ट्या महिलांची मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसत आहे. लाडकी बहिण योजनेमुळे महिलांची टक्केवारी वाढली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. मुख्यमंत्री पदाबाबत अजून कुठलीही चर्चा नसून निकाल आल्यानंतर आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित बसून चांगला निर्णय घेऊ," असेही ते म्हणाले.