आम्ही १०५ चा आकडा पार करणार; चंद्रशेखर बावनकुळेंचा विश्वास

    21-Nov-2024
Total Views |
 
Bawankule
 
नागपूर : लाडक्या बहिणी, शेतकरी आणि ज्यांना डबल इंजिन सरकारचे महत्व माहिती आहे त्या सर्वांनी महायूतीला मतदान केले आहे. त्यामुळे आम्ही आमचा १०५ चा आकडा पार करणार आहोत, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केला. गुरुवार, २१ नोव्हेंबर रोजी त्यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधला.
 
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "एक्झिट पोलचा काहीही अंदाज असला तरी महाराष्ट्रातील जनता महायूतीसोबत आहे, असा मला विश्वास आहे. मोदी सरकारच्या गरीब आणि मध्यमवर्गीय कल्याणाच्या योजना आणि आमच्या सरकारने केलेल्या व्यक्तिगत लाभाच्या योजना बघता राज्यात डबल इंजिनचे सरकार यावे, अशी जनमानसाची भावना होती. त्यामुळे आम्हाला मोठे मतदान झाले आहे. मतदानाचा टक्का वाढला असून तो आमच्या बाजूने दिसतो आहे. जेव्हा उत्साहाने आणि स्वत:हून मतदार बाहेर निघतात त्यावेळी ते सरकारच्या बाजूने आणि चांगल्या कामाच्या बाजूने मतदान करतात."
 
हे वाचलंत का? -  "जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते त्यावेळी..."; उपमुख्यमंत्री फडणवीसांचं विधान
 
"लाडक्या बहिणी, शेतकरी आणि ज्यांना डबल इंजिन सरकारचे महत्व माहिती आहे त्या सर्वांनी महायूतीला मतदान केले आहे. लोकसभेत काँग्रेसने खोटारडेपणा केल्यामुळे लोकांनी त्यांना धडा शिकवायचे ठरवले आहे. त्यामुळे आमचा चांगला विजय होईल. आमचा १०५ चा आकडा आम्ही पार करणार आहोत. एकनाथ शिंदे आणि अजितदादांची कामगिरीसुद्धा चांगली राहिली आहे. त्यामुळे आम्ही तिघेही मिळून पुढे जाणार आहोत," असे ते म्हणाले.