सहा दिवसांनंतर बाजाराला पुन्हा एकदा वैभव प्राप्त; जाणून घ्या काय आहे कारण!
08-Oct-2024
Total Views | 19
मुंबई : सलग सहा दिवसांच्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात वाढ दिसून आली. मागील काही दिवस बाजारात पडझडीचे सत्र सुरू होते. मध्य-पूर्वेतील संघर्ष आणि आरबीआय पतधोरण यासह अन्य गोष्टींचा परिणाम बाजारावर दिसून आला. आज हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेले स्पष्ट बहुमत यामुळे घसरणीचा ट्रेंड थांबला आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून सुरू असलेला इराण-इस्त्रायल तणाव, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि एफपीआय यामुळे बाजारात शेअर्सची प्रंचड विक्री झाली. बाजारातील घसरण पाहता आज गुंतवणूकदारांनी मोठी खरेदी केली. सेन्सेक्स ५८४.८१ अंकांनी तर निफ्टी ५० २१७.४० अंकांनी वधारला आहे. बाजार बंद होताना सेन्सेक्स ८१,६३४.८१ पातळीवर तर निफ्टी ५० २५,०१३.१५ च्या पातळीवर स्थिरावला.
सहा दिवसांनंतर शेअर बाजाराला पुन्हा वैभव प्राप्त झाले. सेन्सेक्स-निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी सकारात्मक वाढ नोंदविली. बजाज ऑटो, कोल इंडिया, अपोलो हॉस्पिटल्स, रिलायन्स, एचडीएफसी बँक या कंपन्यांच्या समभागात २ टक्क्यांपेक्षा वाढ झाली तर टाटा स्टील, टायटन, विप्रो, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयटीसी, टाटा मोटर्स या समभागात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.