कणकवली : (Pravin Darekar) उद्धव ठाकरे हे आपली ताकद कमी झाली ही वस्तुस्थिती स्वीकारायला तयार नाहीत. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना जरी जागा मिळाल्या असल्या तरी मूळ शिवसैनिक एकनाथ शिंदे आणि महायुतीसोबत आहेत. अमित शाह यांचे नेतृत्व देशाने स्वीकारलेले आहे. गृहमंत्री म्हणून त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय या देशाने पाहिलेले आहेत. त्यांचा फडशा उद्धव ठाकरे कसा काय पाडू शकतात. ठाकरेंना फक्त तोंडाच्या वाफा घालवायच्या आहेत. त्यामुळे ते आणि संजय राऊत वाटेल ते बरळत असतात, अशी टीका भाजप गटनेते आमदार प्रविण दरेकरांनी केली आहे.
आमदार दरेकर आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी कणकवली येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागताना दरेकर म्हणाले कि, दसरा मेळाव्यात टोमणे, द्वेष, मत्सर यानेच उत्प्रेत असे ठाकरेंचे भाषण असेल. तुम्ही विसरला नाहीत तर आम्हीही तुम्हाला विसरत नाही. आमच्याही जुन्या जखमा, दुःख आहेतच ना. येणाऱ्या काळात कोण कोणाचा फडशा पाडते, कोण कोणाच्या लक्षात आहे याचे उत्तर निवडणुकीतच मिळेल. लोकसभेवेळी लोकांच्या मनात वेगवेगळ्या विषयांवरून संभ्रम निर्माण केला गेला. परंतु आता दोन वर्षाच्या काळात शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्राचे चित्र बदलले आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या मागे प्रचंड जनाधार उभा राहील, असा विश्वास असल्याचेही दरेकर म्हणाले.
मुंबई बँकेला गोरेगाव येथील भूखंड रद्द करण्याच्या निर्णयावर दरेकर म्हणाले कि, प्रविण दरेकर भाजपाचे, मुंबई बँकेचे अध्यक्ष आहेत म्हणून भूखंड दिला, भूखंड काढला अशा बातम्या होताहेत. परंतु ती एक प्रक्रिया असते. भूखंड दिला होता मात्र त्या भूखंड देण्याच्या प्रक्रियेत खूप अडचणी होत्या. म्हणून मुंबई बँकेला सरकारने सहकार भवनसाठी म्हाडाचा भूखंड प्रतीक्षा नगरला दिला. एका संस्थेला दोन भूखंड देणे उचित नाही. त्यामुळे न्यायिक प्रक्रिया करून सहकार भवनला म्हाडाचा भूखंड दिला असल्याने हा भूखंड रद्द करणे हे कायदेशीर आहे. भाजपाच्या नेतृत्वाखाली मुंबई बँक काम करतेय, मी अध्यक्ष आहे याचा पोटशूळ आमच्या मित्रमंडळींना आहे, असा टोलाही दरेकरांनी विरोधकांना लगावला.
निलेश राणे यांना उमेदवारी दिली तर आमची कोकणातील शिवसेनेची ताकद पूर्णपणे त्यांच्या पाठीशी असेल असे विधान मंत्री उदय सामंत यांनी केले होते. याबाबत दरेकर म्हणाले कि, यावर अजून कोणताही निर्णय झालेला नाही. परंतु आम्ही महायुती म्हणून एकत्र लढणार आहोत. जिथे महायुतीचा जो कुणी उमेदवार असेल त्यासाठी आम्ही सारे ताकदीने कामाला लागू या अर्थाने मंत्री उदय सामंत यांचीही प्रतिक्रिया असेल. निलेश राणे यांना पक्षाने उमेदवारी दिली तर महायुती म्हणूनच काम होईल.