काँग्रेसला भगदाड पडणार? 'हे' ५ मोठे नेते सोडू शकतात पक्ष?
15-Jan-2024
Total Views |
मिलिंद देवरा, हार्दिक पटेल, आरपीएन सिंग, ज्योतिरादित्य सिंधिया, जितिन प्रसाद, अल्पेश ठाकुर, अनिल अँटनी ही सात नेत्यांची नावं. या सातही नेत्याचं एका गोष्टीत साम्य आहे, ते म्हणजे हे सर्व काँग्रेसचे माजी नेते आहेत आणि एकेकाळी या सातही नेत्यांना राहुल गांधींचं निकटवर्तीय मानलं जातं. पण आज हे सर्व राहुल गांधींच्या काँग्रेसला सोडून दुसऱ्या पक्षांमध्ये सामील झाले आहेत. यातील जवळपास सर्वांनाच काँग्रेस सोडल्यानंतर चांगल राजकीय यश मिळालं आणि सध्यातरी त्यांचे राजकीय भविष्य उज्वलच दिसतय. यातील बहुतांश नेत्यांनी पक्ष सोडण्याचे कारण दिलं होत, पक्ष नेतृत्वाची अकार्यक्षमता. म्हणजेच अप्रत्यक्षरित्या या नेत्यांचं म्हणणे होते की, आम्ही राहुल गांधींच्या नाकर्तेपणामुळे पक्ष सोडत आहोत. या नेत्यांव्यतिरिक्त सुद्धा अनेक नेत्यांनी काँग्रेसला मागच्या एका दशकात रामराम ठोकला आहे. पुढील काळात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक काँग्रेस नेते पक्षाला सोडू शकतात अशा चर्चा सुरु आहेत. या नेत्यांची नावे पुढीलप्रमाणे...
सचिन पायलट
या पाच नेत्यांमध्ये पहिलं नाव येते ते म्हणजे सचिन पायलट यांचे. २०१८ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये राजस्थान सारख्या राज्यात काँग्रेसला एकहाती सत्ता मिळवून देण्याचे श्रेय सचिन पायलट यांना जाते. पण सत्ता मिळाल्यानंतर मुख्यमंत्री पदाची माळ अशोक गेहलोत यांच्या गळ्यात पडली. त्यानंतर २०१८ पासून सुरु झालेली पायलट यांची नाराजी अजूनही कायम आहे. अशोक गेहलोत यांनी गद्दार संबोधणे, गांधी घराण्याने दुर्लक्ष करणे, इत्यादी अपमान सहन करुन सुद्धा पायलट आजही काँग्रेसमध्ये टिकून आहेत. राजकीय जाणकारांच्यामते पायलट यांच्या काँग्रेसमध्ये टिकून असण्याला त्यांची पक्षनिष्ठा नाहीतर प्रतिकुल राजकीय समिकरणे जबाबदार आहेत.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा राज्यात दारून पराभव झालायं. तरीही अशोक गेहलोत यांच्याकडेच राजस्थान काँग्रेसचे नेतृत्व आहे. तर पायलट यांना राजस्थानपासून दूर ठेवत छत्तीसगढचा प्रभारी करण्यात आले. छत्तीसगढमध्ये नुकत्याच विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाचा पराभव झाला, त्यामुळे छत्तीसगढमध्ये पालयट यांना करण्यासारखे कोणतेही काम नाही. राजस्थानपासून दूर ठेवणे हा एकप्रकारे राजकीय दृष्ट्या सचिन पायलट यांना डावलण्याचा प्रकार आहे, असं जाणकार सांगतात. त्यामुळे सचिन पायलट किती दिवस काँग्रेसमध्ये राहतात हा प्रश्नच आहे. देवरांच्या पक्ष सोडण्याविषयी जेव्हा पायलट यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी एकदम सौम्य शब्दात प्रतिक्रिया दिली. यावरुन सचिन पायलट सुद्धा काँग्रेसला सोडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
अशोक चव्हाण
सचिन पायलट यांच्यानंतर दुसरे नाव आहे, काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे. मागच्या काही काळापासून अशोक चव्हाण काँग्रेस सोडणार अशा चर्चा सुरु आहेत. त्या चर्चांना विराम लावण्याचे काम सुद्धा अशोक चव्हाण यांनी कधी केल्याचे दिसले नाही. त्यामुळे त्यांच्या भूमिकेविषयी सुद्धा संभ्रमाचे वातावरण आहे. अशोक चव्हाण एकेकाळी महाराष्ट्रात काँग्रेसचा चेहरा होते. पण आज त्यांच्याकडे पक्षाने दुर्लक्ष केलेलं दिसतंय.
पक्षामध्ये सध्या अशोक चव्हाण यांच्यापेक्षा कमी जनाधार आणि अनुभवात कमी असलेल्या नेत्यांकडे महाराष्ट्र काँग्रेसचं नेतृत्व आहे. त्यामुळेच अशोक चव्हाण नाराज असल्याचे बोलले जातं आहे. त्यामुळे अशोक चव्हाण सुद्धा पक्ष सोडण्याची शक्यता कायमचं वर्तवली जात आहे.
आचार्य प्रमोद कृष्णम
अशोक चव्हाण यांच्यानंतर तिसर नावं आहे, आचार्य प्रमोद कृष्णम यांचे. आचार्य प्रमोद कृष्णम हे काँग्रेसमध्ये हिंदुत्वाचे राजकारण करणारे एकमेव नेते होते किंवा आहेत. हे दोन्ही शब्द याच्यासाठी कारण, त्यांनी काँग्रेस सोडण्याची फक्त औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. आचार्य प्रमोद कृष्णम काही दिवसांपासून काँग्रेस हायकमांडच्या हिंदूविरोधी भूमिकेवर सतत ताशेरे ओढत आहेत. कोणीही काँग्रेसच्या हाय कमांडला थेट शिंगावर घेऊन काँग्रेसमध्ये राहू शकत नाहीत, हे जगजाहीर आहे. त्यामुळे लवकरच प्रमोद कृष्णम काँग्रेसमधून स्वत: बाहेर पडतील किंवा त्यांना बाहेर काढले जाणार हे निश्चित.
प्रतिभा सिंह आणि विक्रमादित्य सिंह
आचार्य प्रमोद कृष्णम यांच्यानंतर शेवटचे नाव येते, विरभद्र सिंह यांच्या कुंटुंबाचे. विरभद्र सिंह हे हिमाचलचे २१ वर्ष मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी प्रतिभा सिंह आणि त्यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह हे राजकारणात सक्रीय आहेत. प्रतिभा सिंह या मंडीमधून लोकसभेच्या खासदार आहेत, त्यासोबतच त्या हिमाचलमध्ये काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सुद्धा आहे. तर विक्रमादित्य सिंह हे सध्या सुखविंदर सिंह सुक्खू यांच्या सरकारमध्ये मंत्री आहेत. तरीही काँग्रेस हायकमांडच्या धोरणांवर हे दोघेही नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यात काही दिवसांपूर्वीच रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाण्यावरुन पक्षामध्ये आणि त्यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे.
काँग्रेसच्या हायकमांडने प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजर न राहण्याचा निर्णय घेतला असताना विक्रमादित्य सिंह हे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजर राहणार आहेत. त्यांनी आपल्याला सोहळ्याचे आमंत्रण मिळाले हे आपले भाग्य असल्याचे सुद्धा म्हटले आहे. त्यासोबतच मुख्यमंत्री सुख्यू यांच्यासोबत सुद्धा त्यांचा राजकीय संघर्ष चालूच आहे. या संघर्षाचा शेवट जर प्रतिभा सिंह आणि विरभद्र सिंह यांच्या काँग्रेस सोडण्याने झाल्यास कोणालाही आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.