बायोगॅस हरित अर्थव्यवस्थेचे इंजिन

    08-Jun-2023   
Total Views |
Article On Biogas Makes Green Economy

देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आयातीपेक्षा निर्यात जास्त हवी, तरच त्या देशाची अर्थव्यवस्था सुदृढ समजली जाते. पुणेस्थित ‘सिस्टेमा बायो’ने जगातील सर्वात मोठे बायोगॅस संयंत्र निर्मिती सुविधा निर्माण केले आहे. यात १५० दशलक्ष रुपयांची गुंतवणूक करून आशिया व आफ्रिका खंडातील देशांना आपल्या देशातर्फे ‘सिस्टेमा बायो’ बायोगॅस पुरविणार आहे. यामुळे २०३० पर्यंत जागतिक हरितगृह वायूंमध्ये एक टक्का कपात होईल. परिणामी, आपल्या देशाला कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य गाठणे शक्य होईल.

बायोगॅस हा साहजिकच देशाच्या उन्नतीत महत्त्वाची भूमिका बजावतो. स्वयंपाक करण्यासाठी ‘एलपीजी’ (लिक्विड पेट्रोलियम गॅस) वापरला, तर याचे उत्पादन भारतातील मागणीइतके होत नसल्यामुळे तो आयात करावा लागतो. वाहनांचे इंधन, गॅस आपण फार मोठ्या प्रमाणावर आयात करतो त्यामुळे साहजिकच आपले परकीय चलन मोठ्या प्रमाणात खर्च होते. बायोगॅस हा गाय, म्हैस, रेडा, बैल यांच्या शेणापासून तयार होतो. त्यामुळे तो ग्राहकांना स्वस्तही पडतो. देशाचे परकीय चलन वाचावे म्हणून बायोगॅस फार मोठ्या प्रमाणावर वापरात यावा, म्हणून हा उत्पादित करण्यासाठी व वापर करणार्‍यांना सरकार ‘सबसिडी’ देते. खेडोपाडी ग्रामीण भागात झाडे तोडून त्याची लाकडे वापरून स्वयंपाक केला जात असे. पण, बायोगॅसमुळे झाडे तोडण्याचे प्रमाण कमी होणार आहे.

वृक्षतोडणी म्हणजे पर्यावरणाचा र्‍हास आणि तो बायोगॅसच्या अधिकाधिक वापरामुळे कमी होतो. झाडे तोडण्यामुळे निसर्गाचे संतुलन बिघडते व ते बिघडल्यामुळे निसर्ग कधी कधी रौद्ररुप धारण करतो. यामुळे मनुष्यहानी, वित्तहानी होऊ शकते, याचे प्रमाण कमी होणार आहे. तसेच लाकडे जाळून जो धूर येतो, त्याने स्वयंपाक करणार्‍या महिलांना दमा, क्षयरोग वगैरे सारखे फुफ्फुसांचे रोग होते. बायोगॅस वापरण्यामळे महिलांचे आजारी पडण्याचे प्रमाणही कमी होऊ शकते, असा हा बायोगॅस बहगुणी आहे. तसेच, देशाच्या पंतप्रधानांनी जगाला असे आश्वासन दिले आहे की, भारत २०२३ पर्यंत कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण शून्यावर आणेल व पंतप्रधानांनी जगाला दिलेले हे आश्वासन पूर्ण होण्यासाठी बायोगॅसचीच मदत होणार आहे.

‘सिस्टेमा बायो’ निर्यात वाढविणार

देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आयातीपेक्षा निर्यात जास्त हवी, तरच त्या देशाची अर्थव्यवस्था सुदृढ समजली जाते. पुणेस्थित ‘सिस्टेमा बायो’ने जगातील सर्वात मोठे बायोगॅस संयंत्र निर्मिती सुविधा निर्माण केले आहे. यात १५० दशलक्ष रुपयांची गुंतवणूक करून आशिया व आफ्रिका खंडातील देशांना आपल्या देशातर्फे ‘सिस्टेमा बायो’ बायोगॅस पुरविणार आहे. यामुळे २०३० पर्यंत जागतिक हरितगृह वायूंमध्ये एक टक्का कपात होईल. परिणामी, आपल्या देशाला कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य गाठणे शक्य होईल. येथे वर्षाला एक लाख बायोगॅस संयंत्रांचे वार्षिक उत्पादन होईल. २०२३ अखेरपर्यंत देशातील २१ राज्यांतील ५० हजारांहून अधिक शेतकर्‍यांना याचा फायदा मिळेल. यामुळे भारतातील सहा लाख लोकांची जीवनशैली बदलून स्वच्छ स्वयंपाक व रसायनमुक्त शेती करता येईल. ‘सिस्टेमा बायो’ ही कंपनी नसून, ही ख्यातनाम जागतिक सामाजिक संस्था आहे.

या संस्थेची नावीन्यपूर्ण बायोगॅस तंत्रज्ञानामध्ये खासियत आहे. नुकत्याच झालेल्या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून या संस्थेने चाकण येथे सर्वांत मोठ्या बायोगॅस संयंत्र निर्मिती सुविधेचे अनावरण केले. याची एक लाख पूर्वरचित बायोगॅस संयंत्रांची वार्षिक उत्पादन क्षमता आहे. या प्रक्रियेतून बाहेर पडणार्‍या प्रत्येक स्मार्ट बायोगॅस युनिटमधून शेतकर्‍यांना प्रभावित जीवन, चांगले मानवी आरोग्य व हवामानाची चांगली स्थिती हे फायदे मिळू शकतात. ‘सिस्टेमा बायो’कडे, बायोगॅस अणुभट्टी व ‘मेम्ब्रेन टेम्पलेट’साठी क्रांतिकारी बायोगॅस तंत्रज्ञानाचे पेटंट भारतात आहे. भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने डिसेंबर २०२२ मध्ये ‘सिस्टेमा बायो’च्या आधुनिक आणि नावीन्यपूर्ण बायोगॅस तंत्रज्ञानाला मंजुरी दिली आहे. ही संस्था एनजीओ, सहकारी व खासगी डेअरी तसेच ग्रामीण विकास संस्थांमार्गे ‘सिस्टोमा बायो’ लाखो शेतकर्‍यांपर्यंत पोहोचते.

या संस्थेचे मुख्य कार्यालय मेक्सिको शहरात आहे. ही संस्था शेतकर्‍यांना संयंत्रांची स्थापना, प्रशिक्षण आणि सर्वसमावेशक विक्री पश्चात चांगली सेवा देते. ‘सिस्टेमा बायो इंडिया’ हा एक सामाजिक उपक्रम असून ही संस्था गरिबी, अन्न सुरक्षा व हवामान बदल यासाठी प्रयत्नशील असते. ही संस्था शेणापासून जैवखतही उत्पादित करते. ही खत नैसर्गिक असतात. रसायन मिश्रित नसतात. परिणामी, शेती उत्पादन वाढते.

बायोगॅस म्हणजे जैविक प्रक्रियांमधून बाहेर पडणारा वायू. जर एखादी जैविक प्रक्रिया ऑक्सिजन विरहित वातावरणात झाली, तर बायोगॅसची निर्मिती होते. पुन्हा पुन्हा वापरता येण्याजोग्या ऊर्जास्रोतांपैकी एक म्हणजे बायोगॅस. या जैविक वायूचा उपयोग घरगुती तसेच शेतीच्या कामांसाठी उपयोग होतो. यात मुख्यत: हायड्रोकॉर्बन्स असतात, ते ज्वलनशील असल्याने जळताना उष्णता आणि ऊर्जा उत्पन्न करतात. एका जैवरासायनिक क्रियेमधून हा वायू उत्पन्न होतो. या प्रक्रियेच्यादरम्यान काही विशिष्ट प्रकारचे जीवाणू म्हणजे ‘बॅक्टेरिया’. जैविक कचर्‍यांचे रुपांतर उपयुक्त अशा बायोगॅसमध्ये करतात. जैविक प्रक्रियेमुळे हा वायू उत्पन्न होत असल्याने याला ‘बायोगॅस’ असे म्हणतात. मिथेन हा वायू बायोगॅसचा मुख्य घटक असतो.

बायोगॅस संयंत्रांसाठीचा मुख्य कच्चा माल म्हणजे गाईगुरांचे शेण. फक्त शेणापासून उत्पादित होणार्‍या गॅसला ‘गोबर गॅस’ म्हणतात. बायोगॅसमध्ये शेणाखेरीज कुक्कुटपालनामधील कचरा, शेतामधील कचरा, वाहून नेला जाणारा मैला यांचाही वापर कच्चा माल म्हणून होतो. हे पर्यावरण मित्रत्वपूर्ण इंधन आहे. बायोगस निर्मितीसाठी लागणारा कच्चामाल खेडोपाडी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो. या प्रक्रियेत बायोगॅस खेरीज द्रवस्वरुप स्लरीदेखील तयार होते. स्लरीमध्ये पोषणमूल्ये भरपूर असतात. परिणामी हिचा खत म्हणून वापर केला जातो. बायोगॅसद्वारे निर्माण होणारे वायू प्रदूषण नैसर्गिक वायूप्रमाणेच असते.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

शशांक गुळगुळे

लेखक बँकेत मॅनेजर म्हणून कार्यरत होते. २०११ साली त्यांनी सेवानिवृत्ती पत्करली. एम.ए इन इकोनॉमिक्स, डिप्लोमा इन कॉम्प्युटराईज्ड बँकिंग ऍप्लीकेशन असे आर्थिक क्षेत्राशी संलग्न शिक्षण. ते अर्थ-उद्योग विषयातील अभ्यासक आहेत.