पंतप्रधानांच्या ‘देखो अपना देश’ संकल्पनेशी सुसंगत ‘क्रूझ पर्यटन’

    22-Jun-2023   
Total Views |
The new cruise program Costa Cruises In India

क्रूझविषयी आपण ऐकून असतोच. तेव्हा, आजच्या या लेखात क्रूझ पर्यटनामुळे अर्थव्यवस्थेला मिळणारी चालना आणि या पर्यटनाचे विविध प्रकार यांची माहिती करुन घेऊया...

पर्यटन व्यवसाय हा देशाला आर्थिक बळ देणारा, तसेच आर्थिक व्यवहारांना चालना देणारा उद्योग आहे. या उद्योगासाठी भांडवली खर्चही फार होत नाही. आपल्या देशात पर्यटनांच प्रचंड वैविध्य आहे. कित्येक थंड हवेची ठिकाणे, प्रचंड समुद्रकिनारे आहेत. भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. पूर्वेला बंगालचा उपसागर आहे, तर दक्षिणेला हिंदी महासागर आहे. जंगले आहेत, महाकाय नद्या आहेत, मनोवेधक वास्तू आहेत. पण, आपल्या देशात जलपर्यटनाला (क्रूझ पर्यटन) भरपूर वाव द्यायचा आहे, अशी माहिती भारत सरकारने बंदरे, जहाजबांधणी व जलमार्गमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी नुकतीच मुंबईत दिली.

भारतीयांनी परदेशी पर्यटन करावे, पण आपल्या देशातली पर्यटन करावे. उदाहरणच द्यायचे, तर मुंबईतला एखादा माणूस पर्यटनासाठी जर कोकणात गेला. कोकणात उद्योग जवळ जवळ नसल्याच जमा आहेत, तर तो माणूस कोकणात हॉटेलात राहणार. तेथे खर्च करणार. तेथे काही खरेदी करणार.परिणामी, कोकणच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते. असे आपण भारतीयांनी वर्षातून एकदा तरी देशांतर्गत पर्यटनाला पसंती दिली, तर भारतभर आर्थिक व्यवहारांत वाढ होऊ शकेल. आपल्या पंतप्रधानांनी आपल्या भाषणात बरेच वेळा सांगितले आहे की, जेथे जाल तेथे स्थानिक वस्तू खरेदी करा. याचे कारण स्थानिक वस्तू खरेदीमुळे त्या ठिकाणांची आर्थिक उलाढाल वाढते. तसेच, परदेशी पर्यटकही भारतात फार मोठ्या प्रमाणावर यायला हवेत. परिणामी, आपल्या देशाची परकीय चलनाची स्थिती सुधारते.

कोस्टा क्रूझेस

केवळ भारतासाठी समर्पित केलेला एक नवीन क्रूझ कार्यक्रम ‘कोस्टा क्रूझेस’ भारतात सुरू होणार आहे, अशी घोषणा केंद्रीय जलमार्गमंत्री सर्वानंद सोनावाल यांनी नुकतीच केली.

इटलीच्या या कंपनीने भारतासाठी ‘कोस्ट सेरेना’ हे जहाज त्यासाठी निवडलेले आहे. दि. ४ नोव्हेंबर व दि. १ जानेवारी, २०२४ या कालावधीत एकूण २३ क्रूझ पर्यटनाचे कार्यक्रम देशांतर्गत ठिकाणांना भेट देणार आहेत. परिणामी,भारतीयांना त्यांच्याच देशातील काही सुंदर ठिकाणे अनोख्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी मिळेल. हा जलपर्यटन प्रवास मुंबई, कोचीन, गोवा व लक्षद्वीप असा होणार आहे. ‘कोस्टा सेरेना’ हे भारतातील देशांतर्गत प्रवासाचे संचलन करणारे सर्वात मोठे क्रूझ जहाज असेल. केंद्रीय जलमार्गमंत्री सर्वानंद सोनोवाल यांना असे वाटते की, जलमार्ग हा भारताचा एक खजिना आहे. भारताला प्रचंड लांबीचा समुद्र लाभला असल्यामुळे, आपल्या देशात समुद्री क्रूझ पर्यटन यशस्वी होऊ शकेलच, पण आपल्या देशात कित्येक नद्या या महाकाय असल्यामुळे नदी क्रूझ पर्यटन ही भारतात यशस्वी होऊ शकेल. भारतीयांनी देशांतर्गत पर्यटनाला प्राधान्य देण्यासाठी पंतप्रधानांनी ‘देखो अपना देश’ ही संकल्पना मांडली. ही यशस्वी होऊ देणे, हे भारतीयांच्या हातात आहे. जलपर्यटनामुळे प्रदूषणात भर पडत नाही. रस्त्यांवर फार मोठ्या प्रमाणावर अपघात होऊन जलपर्यटनात अपघातांची जोखीम फारच कमी असते. ‘कोस्टा सेरेना’मध्ये १ हजार, ५०० केबिन आहेत. यात वेलनेस सेंटर, व्यायामशाळा, ब्युटी सलून, थिएटर, भारतीय आणि आंतरराष्ट्रीय भोजन देणारी रेस्टॉरन्टस्, स्विमिंग पूल, शॉपिंग एरिया आणि मुले व किशोरवयीन मुलांसाठी एक किड्स क्लब ही आहे.

भारतातील क्रूझ सेवा

भारतात सध्या मुंबई, गोवा, लक्षद्वीप, केरळ बॅकवॉटर सुंदरबन, अंदमान, कोची, मालदीव, गंगा व ब्रह्मपुत्रा नद्या येथे क्रूझ सेवा उपलब्ध आहेत. सुंदरबन नदी क्रूझ, ब्रह्मपुत्रा नदी क्रूझ, दिब्रू साईखोवा नदी क्रूझ, गंगा हेरिटेज नदी क्रूझ, अंदमान बेटे क्रूझ व गोवा क्रूझ या सध्या देशातील लोकप्रिय क्रूझ सेवा आहेत. भारतातून परदेशात क्रूझने थायलंड, सिंगापूर, मलेशिया, श्रीलंका, मालदीव, इंडोनिशिया, दुबई व आशिया टूर्स या सेवा उपलब्ध आहेत. संपूर्ण जग जलपर्यटनाने म्हणजे क्रूझने फिरायचे असल्यास एका माणसाला साधारणपणे रुपये २५ लाख खर्च येतो. क्रूझ या शब्दाचे मूळ डच भाषेत आहे. भारतात चेन्नई, गोवा, कोचिन, मंगळुरु व मुंबई ही क्रूझची ‘पाच एम. व्ही. गंगा विलास’ ही भारतातली सर्वात मोठी क्रूझ सेवा आहे. हीचा प्रवास उत्तर प्रदेशातील वाराणसीपासून सुरू होतो. ५१ दिवसांच्या प्रवासात ही सेवा ३ हजार, २०० किलोमीटर पाणी कापते. ही बांगलादेश मार्गे आसाममध्ये दिब्रुगडपर्यंत जाते. भारत व बांगला देशातल्या एकूण २७ नद्यांतून हिचा प्रवास होतो. केरळ हे भारतातील क्रूझ पर्यटनासाठी सर्वांत लोकप्रिय राज्य आहे. केरळ बॅक वॉटर क्रूझ अतिशय लोकप्रिय. भारतात सुमारे १०० क्रूझ जहाजे आहेत. भारतात पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रूझ सेवेचे उद्घाटनही केंद्रीय जलमार्गमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी दि. ५ जानेवारी रोजी केले होते. ‘एम ही एम्प्रेस’ ही क्रूझ सेवा चेन्नई ते श्रीलंका अशी सुरू झाली होती. क्रूझ व्यवसाय सुमारे १५ हजार जणांना रोजगार देतो, यापैकी ५० टक्के रोजगार गोवा राज्यात आहे. क्रूझ पर्यटनासाठी नोव्हेंबर ते मार्च हा कालावधी चांगला, असे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

क्रूझ पर्यटनाचे प्रकार

समुद्रात क्रूझ सेवा, नद्यांत क्रूझ सेवा, एकट्याने करावयाचे क्रूझ पर्यटन, कौटुंबिक क्रूझ पर्यटन, वरिष्ठ नागरिकांसाठी तसेच पती-पत्नीसाठींचे क्रूझ पर्यटन, लक्झरी क्रूझ पर्यटन, साहसी क्रूझ पर्यटन. रेल्वे, विमान किंवा रस्तामार्गे पर्यटन करणार्‍यांचे प्रमाण भारतात जितके आहे तितके जलपर्यटन करणार्‍यांचे प्रमाण भारतात नाही. यात फार मोठ्या प्रमाणावर वाढ व्हायला हवी. या पर्यटनाने प्रदूषणनिर्मिती होत नाही. रस्तामार्गे पर्यटन करण्यामुळे प्रदूषणात बरीच भर पडते. नुसत क्रूझ पर्यटनच नाही, तर जलमार्गे प्रवासी वाहतूक ही फार मोठ्यावर भारतभर, सुरू होऊ शकते. जलमार्गे प्रवासी सेवा फार मोठ्या प्रमाणावर सुरू झाली, तर इतर सेवांवर सध्या जो ताण आहे, तो कमी होऊ शकतो. कित्येक प्रवासी वाहतूक सेवांवर ताण असल्यामुळे अपघातही होतात, ते ही कमी होतील.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

शशांक गुळगुळे

लेखक बँकेत मॅनेजर म्हणून कार्यरत होते. २०११ साली त्यांनी सेवानिवृत्ती पत्करली. एम.ए इन इकोनॉमिक्स, डिप्लोमा इन कॉम्प्युटराईज्ड बँकिंग ऍप्लीकेशन असे आर्थिक क्षेत्राशी संलग्न शिक्षण. ते अर्थ-उद्योग विषयातील अभ्यासक आहेत.