ही फसगत नेहमीचीच!

    19-Apr-2023   
Total Views |
 Ajit Pawar political strategy

अजित पवार हे आपल्या नेहमीच फसणार्‍या बंडांमुळे सातत्याने चर्चेत असतात. दर दोन-तीन वर्षांनी नाराजीच्या चर्चा घडवून आणायच्या, आमदार एकत्र करून बंड करत असल्याच्या बातम्या स्वतःच पेरायच्या आणि अखेरीस काका शरद पवारांनी सुनावल्यावर सपशेल माघार घ्यायची, हा शिरस्ता अजित पवार गेली अनेक वर्षे पाळत आहेत. अजित पवारांनी आजवर केलेल्या बंडाचा विचार करता उच्च पदाची महत्त्वाकांक्षा आणि पक्षावर एकहाती पकड करण्याची सुप्त इच्छा या दोन बाबी बंडामागे दिसतात. मात्र, त्यापलीकडेही सुप्रिया सुळेंच्या हाती पक्षाची धुरा जाऊ नये आणि काकांनंतर बहिणीच्या हाताखाली काम करायला लागू नये, ही त्या मागील खरी कारणे आहेत. अजितदादांनी केलेली बंड फसली. कारण, राष्ट्रवादी काँग्रेसवर आजही शरद पवारांच्या एकहाती आणि भक्कम नेतृत्वाचे गारुड कायम आहे. पक्षाची स्थापना होऊन २४ वर्षे उलटून गेली तरी आजही पवार हेच पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे पवारांचा तळागाळातील कार्यकर्त्यांशी आजही ‘कनेक्ट’ कायम आहे. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांशी आणि गावकर्‍यांशी असलेला थेट संपर्क, स्थानिक प्रश्नांची जाण असल्याने शरद पवारांविषयी आमदारांमध्ये एक आपुलकीची भावना आहे. कुठलीही गोष्ट ‘लॉजिकल एंड’वर संपवण्याचा शरद पवारांचा गुण अजित पवारांमध्ये नाही, हेच अजितदादांच्या फसगतीचे मुख्य कारण. बंड केल्यानंतर आपण ही कृती करण्यामागे नेमकी कारणे काय आणि बंडानंतर आपल्या समर्थक आमदारांचे काय करणार, याबाबत स्पष्टता करण्यात अजितदादा कमी पडतात आणि त्यामुळे दादांची बंड फसतात, असे स्वतः राष्ट्रवादीचे आमदार खासगीत बोलतात. मुळातच अजितदादांच्या बाबतीत प्रतिमारंजन करून त्यांना वास्तवापेक्षा अधिक मोठे दाखवण्यात आले. त्यातच अजितदादांच्या भाटांनी ‘दादा म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस’ असे भासवण्याचा प्रयत्न केला. पण, दिल्लीत राहूनही शरद पवारांनी पक्षावरील आपली मजबूत पकड सैल होऊ दिलेली नाही, ज्याचा प्रत्यय २०१९ साली झालेल्या आणि परवा फसलेल्या बंडानंतर पुन्हा दिसून आला. अजितदादांची धरसोड वृत्ती, एकीकडे कुटुंब आणि दुसरीकडे राजकीय अस्तित्व हा पेच, भाजपत जायचं की नाही यावरून निर्माण झालेला संभ्रम आणि पक्षांतर्गत निर्माण झालेली कोंडी, या सगळ्या धुमश्चक्रीत गोंधळलेल्या अजितदादांची कायम फसगतच झाली, जी त्यांच्या आक्रमक राजकीय नेतृत्व या प्रतिमेला तडा देऊन गेली!
ही तर सुरुवातच!

अजित पवारांच्या फसलेल्या तिसर्‍या बंडावेळी राज्यात इतरही काही राजकीय घडामोडी घडल्या. भाजपकडून राज्यात ‘ऑपरेशन लोटस’ सुरू असून, अजित पवार यांना फोडून भाजपला त्यांचे अभियान यशस्वी करायचे आहे, असा दावा ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी केला होता. यावर बंडाची सांगता झाल्यावर माध्यमांसमोर आलेल्या अजित पवारांनी स्वतः खुलासा करत “इतर पक्षाच्या प्रवक्त्यांनी आमचे वकीलपत्र घेऊ नये आणि आमची बाजू मांडू नये,” असे म्हणत राऊतांना चांगलेच फटकारले. त्यावरून संजय राऊत यांनीही स्पष्टीकरण देत ’‘मी ‘ऑपरेशन लोटस’विषयी लिहिले ते योग्यच आहे. मी जे लिहिले ते सत्य असून, जर कुणाला त्याचा त्रास होत असेल, तर त्याला मी काहीही करू शकत नाही. शरद पवार यांनी जर माझ्याविषयी प्रश्न उपस्थित केले, तर त्याकडे मी गांभीर्याने पाहीन आणि मी केवळ त्यांचेच ऐकेन,” या शब्दांत राऊतांनीदेखील अजितदादांना प्रत्युत्तर दिले. मुळातच जेव्हा तीन भिन्न प्रकृती आणि विकृतीचे पक्ष एकत्र येतात, तेव्हा अशाप्रकारचे वाद निर्माण होणे स्वाभाविकच. ‘मी फक्त पवारांचे ऐकेन’ या राऊतांच्या विधानामुळे महाविकास आघाडीत नेमकं कुणी कुणाचं ऐकायचं?


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.