आपल्या लष्करी बळावर तिबेट गिळंकृत करणार्या चीनला नेहमीच तेथील स्वातंत्र्य चळवळीची भीती वाटते. अशातच
दलाई लामांनी धर्मशाळा येथे तिबेटी बौद्ध धर्मातील तिसरा सर्वांत महत्त्वाचा आध्यात्मिक धर्मगुरू म्हणून एका मंगोलियन बालकाचे नाव दिले आहे. या नियुक्त केलेल्या धर्मगुरूमुळे चीनला मोठा धक्का बसला आहे. म्हणूनच या तिबेटी आध्यात्मिक स्वातंत्र्यलढ्याच्या सद्यस्थितीची समीक्षा करणे जरूरी आहे.
तिबेटच्या अस्मिता, संघर्षाचे प्रतीक असलेले आणि निर्वासित जीवन जगताना धैर्य, शांती व अहिंसेचा परिचय देणारे दलाई लामा. दलाई लामांच्या मृत्यूनंतर पुढचे लामा हे चीनमधूनच होतील, असे चीन सरकार वारंवार सांगत आला. त्या पाश्वर्र्भूमीवर दलाई लामांनी मंगोलियन बालकाची केलेली नियुक्ती ही भारतासाठीदेखील तितकीच महत्त्वाची ठरावी. तिबेटी स्वातंत्र्य चळवळीने तोंड वर काढू नये, यासाठी चीन नेहमीच सतर्क असतो. गेल्या सहा दशकांपासून भारतात राहत असलेल्या दलाई लामांनी हिमाचल प्रदेशातीलधर्मशाळा येथे ६०० पेक्षा अधिक मंगोलियन नागरिकांच्या उपस्थितीत आपल्या नव्या आध्यात्मिक धर्मगुरूची नियुक्ती केली. या धर्मगुरूचे वय अवघे आठ वर्ष असून, दलाई लामा यांनी या मुलाला ‘दहावे लामा खलखा जेटसन धम्पा रिनपोछे’ यांचा पुनर्जन्म असल्याचे मानले आहे. बौद्ध धर्मात धर्मगुरूंच्या पुनर्जन्माला विशेष महत्त्व.
लामांकडून केलेल्या या नियुक्तीला चीन सरकारची अद्याप प्रतिक्रिया आली नसली तरी, यावर चीन जोरदार निषेध व्यक्त करणार, हे मात्र नक्की. दलाई लामा यांनी २०१६ मध्ये मंगोलियाचा दौरा केला होता. त्यावर चीन सरकारने जोरदार टीका करत या दौर्यामुळे चीन-मंगोलिया संबंधांवर नकारात्मक परिणाम झाला असल्याचे म्हटले होते. यावर लामा चीनला प्रत्युत्तर देत म्हणाले होते की, “पुढच्या लामाचा मंगोलियात पुनर्जन्म झाला असून, उत्तराधिकारी मंगोलियन होणार,” असेही लामा म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून शोधमोहीम सुरू होती. त्यामुळे दलाई लामांनी केलेल्या या धर्मगुरूंच्या नियुक्तीने चीनला पुन्हा तिबेटमध्ये स्वातंत्र्य चळवळ उभी राहतेका, हा प्रश्न सतावल्याशिवाय राहणार नाही.
आपली अस्मिता गमावून बसलेल्या तिबेटवर चीनने आजपर्यंत विविध प्रकारे आक्रमणे केली. सर्वप्रथम सांस्कृतिक आक्रमण करून मूळ तिबेटीयन धर्म, संस्कृती, परंपरेला ध्वस्त केले. तसेच तेथे चिनी संस्कृती रुजवून मांडरिन भाषा अभ्यासक्रमात आणली. दुसरे आर्थिक आक्रमणाद्वारे तिबेटमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिककरण करून भौतिकवाद निर्माण केला. गेल्या सात दशकात चीनने पद्धतीशरपणेतिबेटचे चिनीकरण करण्याचा प्रयत्न केला. चिनी नागरिकांना अगदी पद्धतशीरपणे तिबेटमध्ये वसवले. तिबेटची राजधानी असलेल्या ल्हासामध्ये मूळ तिबेटीयनांइतकीच चिनी नागरिकांची संख्या आहे.
आपली अस्मिता, परंपरा, धर्म जपण्यासाठी गेल्या सात दशकांपासून झगडा देणार्या तिबेटींना धर्मगुरूंच्या नियुक्तीने न्याय मिळणार नाही. आजपर्यंत चीनने तिबेटवर केलेल्या आक्रमणात दहा लाखांपेक्षा अधिक तिबेटी नागरिक मारले गेले आहे. १९८०, १९९० आणि २००८ या वर्षांमध्येही चीनविरूद्ध उठाव झाला होता. परंतु, त्याला चिरडून टाकण्यात आले. जागतिक स्तरावर त्याची फारशी दखलही घेतली गेली नाही. भारत आणि चीनचे वैर सर्वश्रुत आहे. चीनने बळकावलेला अक्साई चीन भारताला आजही खुपतोय. त्यातच आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची कोंडी करण्यासाठी चीन नेहमीच धडपड करतो. पाकिस्तानला शस्त्रपुरवठा असो की, श्रीलंकेमध्ये हेरगिरी जहाज पाठवून भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न असतो, अशा या महासत्तेला गलवान, डोकलाम येथे भारताने दणका दिला. मात्र, भारताकडून आर्थिक बळाच्या जोरावर ‘स्टार्टअप’, ‘मेक इन इंडिया’, ‘स्वदेशी’ या उपक्रमांमार्फत चिनी उत्पादनांना पर्याय हेच सडेतोड उत्तर राहणारआहे, हे मात्र नक्की!
-अमित यादव