मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वव्यापी नेतृत्व, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे रथाचे सारथ्य आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांच्यासारखा अर्जुन आपल्याकडे आहे. त्यामुळे लोकसभा, विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकीत यावेळी भाजप आजपर्यंतचे सर्व ‘रेकॉर्ड ब्रेक’ करुन विजयी होईल,” असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
मुंबई भाजपच्या कार्यकारिणीची बैठक रविवार, दि. 12 फेब्रुवारी रोजी दादर येथील ‘वसंतस्मृती’ सभागृहात पार पडली. या बैठकीला पहिल्या सत्रात भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी मार्गदर्शन केले. आ. अतुल भातखळकर यांनी राजकीय प्रस्ताव मांडला. त्याला आ. अमित साटम यांनी अनुमोदन दिले. मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही मार्गदर्शन केले. या बैठकीला खा. गोपाळ शेट्टी, पूनम महाजन, मनोज कोटक यांच्यासह सर्व आमदार आणि मुंबई पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीचा समारोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाने झाला.
“महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत एकमेव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असे होते की, त्यांच्या खिशाला पेन नाही. त्यांनी कधी कुठल्या पत्रावर शेरा मारला नाही आणि म्हणूनच त्यांना कंटाळून त्यांचे 40 आमदार गेले. उद्धव ठाकरे यांनी पत्रावर मारलेला शेरा दाखवा व एक हजार रुपये मिळवा,” असा उपरोधिक टोला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.
“देवेंद्र फडणवीस हे असे नेतृत्व आहे की, प्रत्येक पत्रावर आदेश लिहून प्रशासनाला निर्देश देत राहतात. जनतेसाठी अहोरात्र मेहनत करणारे नेतृत्व आपल्याकडे आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात हजारो जण, आज भाजपमध्ये येण्यास तयार आहेत. आपली वाट पाहत आहेत, मोठे पक्षप्रवेश आम्ही करु. पण, प्रत्येक बुथवर किमान 25 पक्षप्रवेश कार्यकर्त्यांनी करा. विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या किंचित सेनेचे पदाधिकारी, तर, त्यांना एवढे कंटाळले आहेत की, ते आपली वाट पाहत आहेत. त्यामुळे कामाला लागा,” असे आदेश बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना दिले.
आ. अॅड. आशिष शेलार म्हणाले की, “शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, वंचित, माकपा, सपा हे सगळे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भीतीने एकत्र आले असून भाजपसोबत होते, तेव्हा सन्माननीय नेतृत्व शिवसेनेसोबत होते, मतदार होते आणि आमदारही होते. भाजपशी गद्दारी केल्यापासून ना त्यांच्याकडे नेतृत्व आहे, ना मतदार आहेत, ना आमदार आहेत. आज मतांसांठी दारोदारी कटोरा घेऊन फिरावे लागते आहे. आपण जनतेच्या सेवेत असून मुंबईकर हे पाहत आहेत. देशाचे गृहमंत्री अमित शाह मुंबईत आले त्यावेळी बाळासाहेबांची शिवसेनेसह ‘एनडीए’चे 150 नगरसेवक मुंबई महापालिकेत विजयी होतील आणि भाजपचाच महापौर होईल. हा जो संकल्प सोडला आहे तो आपल्याला सर्वांना पूर्ण करायचा आहे. त्या दृष्टीने आपल्याला कामाला लागायचे आहे,” असे कार्यकर्त्यांना आवाहन करताना आ.अॅड.आशिष शेलार यांनी गेल्या 25 वर्षांत मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेने पूर्ण केलेले एक काम दाखवा असे सांगत जोरदार हल्लाबोल केला.
दीपा पाटील यांचा पक्ष प्रवेश
आमदार मनीषा चौधरी यांच्या दहीसर विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी दीपा गणेश पाटील, शाखाप्रमुख गणेश पाटील व त्यांच्या त्यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
‘’हिंदुस्तान देख रहा है, एक अकेला सबको भारी पड रहा है, राज्यसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही बाब अधोरेखित केली, त्याचप्रमाणे मुंबईमध्येसुद्धा ‘एक मोदी सगळ्यांना भारी पडेल,” असा विश्वास व्यक्त करत मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. अॅड. आशिष शेलार यांनी भाजप कार्यकर्त्यांना समजदारी, सहनशक्ती आणि सेवाकार्य वाढवा, असे निर्देश दिले.
येणारा काळ हा आपला : चंद्रशेखर बावनकुळे
“प्रत्येक पदाधिकार्यांनी दोन हजार घरी प्रवास करणे अपेक्षित असून 500 घरी ‘धन्यवाद मोदी’, 500 घरांमध्ये ‘फ्रेंडस ऑफ बीजेपी’, 500 ‘युवा वॉरियर्स’ अशा स्वरुपात कामाला लागायचे आहे. येणारा काळ हा आपला आहे. वातावरण उत्तम, सक्षम नेतृत्व, निर्णय घेणारे केंद्रात आणि राज्यात सरकार यामुळे ‘अभी नही तो कभी नही’,” असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे
मुंबई महापालिकेत 150 नगरसेवक निवडून येतील यादृष्टीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
शिवसेनेच्या कार्यकाळात झालेल्या भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा राजकीय ठराव
प्रत्येक प्रभागामधील विरोधकांची स्थानिक पातळीवरील चुकीची कामे लोकांच्या निदर्शनास आणणार!
पक्ष संघटन आणखी मजबूत आणि विविध कार्यक्रम राबवण्यासाठी निर्णय
राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोहोविण्यासाठी काम करण्याचा सूचना