मुंबई : "इंडिया आघाडीच्या मित्र पक्षांसोबत जागावाटप न केल्यामुळे काँग्रेसला तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीत पराभव स्विकारावा लागला, असे विधान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी केले. त्या रविवारी जाहीर करण्यात आलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवावर भाष्य करत होत्या.
ममतांच्या बनर्जींच्या या विधानामुळे इंडिया आघाडीच्या एकीवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. ममता बनर्जी म्हणाल्या की, " हा काँग्रेसचा पराभव आहे, जनतेचा नाही. काँग्रेसने तेलंगणा जिंकला आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान जिंकता आले असते. पण इंडिया आघाडीतील मित्र पक्षांसाठी जागा न सोडल्यामुळे मतविभाजन होऊन काँग्रेसचा पराभव झाला."
ममता बनर्जींच नाहीतर इंडिया आघाडीत इतर घटक पक्षांनी सुद्धा पराभवाचे खापर काँग्रेसवरच फोडले. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी काँग्रेसचा हा पराभव त्यांच्या घमंडी वर्तनामुळे झाला, असे विधान केले आहे.
तर इंडिया आघाडीच्या स्थापनेसाठी पुढाकार घेणाऱ्या नितीश कुमारांनी सुद्धा काँग्रेसवर निशाना साधला. ते म्हणाले की, "काँग्रेस एकट्याच्या बळावर भाजपला टक्कर देऊ शकत नाही." राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीतील घटक पक्षच काँग्रेसवर निशाना साधत असताना, महाराष्ट्रात उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी काँग्रेसच्या पराभवावर सावरासावर करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, "काँग्रेसच्या पराभवाचा परिणाम इंडिया आघाडीच्या एकीवर होणार नाही."