रांची : उत्तराखंडमधील विविध भागात असलेल्या ३० मदरशांमध्ये गैर-मुस्लिम मुले इस्लामिक शिक्षण घेत असल्याची प्रकरण उघडकीस आले आहे. आतापर्यंत ७४९ गैर-मुस्लिम विद्यार्थ्यांची ओळख पटली असून, त्यात हिंदूंची संख्या सर्वाधिक आहे. हे मदरसे उधम सिंह नगर, नैनिताल आणि हरिद्वार जिल्ह्यात आहेत. या संदर्भात राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाने (NCPCR) उत्तराखंड मदरसा शिक्षण परिषदेकडून उत्तर मागितले आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, NCPCR ने दि. २ नोव्हेंबर २०२३ रोजी उत्तराखंड मदरसा शिक्षण परिषदेला पत्र जारी केले होते. या पत्रात राज्यभरातील मदरशांमध्ये एकूण किती विद्यार्थी शिकत आहेत, याची माहिती मागवण्यात आली होती. आयोगाने उत्तर देण्यासाठी १ आठवड्याचा म्हणजेच ९ नोव्हेंबरपर्यंतचा वेळ दिला आहे. NCPCR च्या नोटीसवरून उत्तराखंड मदरसा शिक्षण परिषदेने अहवाल तयार केला आहे.
उत्तराखंडमधील मदरशांमध्ये एकूण ७३९९ विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. यातील ७४९ विद्यार्थी गैरमुस्लिम आहेत. हे सर्व बिगर मुस्लिम विद्यार्थी ३० वेगवेगळ्या मदरशांमध्ये शिक्षण घेतात. हरिद्वारच्या मदरशांमध्ये सर्वाधिक बिगर मुस्लिम विद्यार्थी आहेत. शिकोहपूर, हरिद्वार येथील मदरसा राव असगर अली मेमोरियल पब्लिक स्कूलमध्ये १३१ गैर-मुस्लिम विद्यार्थी, टिळकपूरमधील मदरसा बहार-ए-चमनमध्ये ११२ आणि मदरसा तुल अलीम, रुरकी येथे ७९ विद्यार्थी शिकतात.
हरिद्वारमध्येच मदरसा राष्ट्रीय एकतामध्ये ८५ बिगर मुस्लिम विद्यार्थी आणि मदरसा जामिया इस्लामियामध्ये ५० बिगर मुस्लिम विद्यार्थी शिकत आहेत. याशिवाय मदरसा साबीर इस्लामियामध्ये ६८ बिगर मुस्लिम विद्यार्थी आणि उधमसिंह नगर येथील साबीर बाबा साहेब मदरसामध्ये २१ बिगर मुस्लिम विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नैनितालच्या मदरसा सिराजुल उलूम नूरियामध्ये चार गैर-मुस्लिम मुले शिकत आहेत. मुस्लिम विद्यार्थ्यांच्या संख्येच्या बाबतीतही हरिद्वार पहिल्या क्रमांकावर आहे.
एकट्या हरिद्वारमध्ये २१ मदरसे आहेत. त्याच वेळी, उधम सिंह नगरमध्ये ९ आणि नैनितालच्या गुलारघाटी रामनगरमध्ये १ मदरशांची नोंद झाली आहे. हा अहवाल उत्तराखंड मदरसा शिक्षण परिषदेचे संचालक राजेंद्र सिंह यांनी पाठवला आहे. या अहवालात राज्य मदरसा शिक्षण परिषदेने म्हटले आहे की, सर्व मुलांना एनसीईआरटीच्या धर्तीवर शिकवले जात आहे. तसेच, हा अभ्यास मुलांच्या पालकांच्या संमतीने केला जात आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी याप्रकरणी पाचजन्यशी बोलताना सांगितले की, मदरशांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तपासानंतर ५ मदरसे बंद करण्यात आले. त्यांनी सांगितले की मदरशांमध्ये शिकणाऱ्या बिगर मुस्लिम विद्यार्थ्यांना इतर शाळांमध्ये पाठवले जाईल. गैरमुस्लिम विद्यार्थ्यांना कोणत्या परिस्थितीत मदरशांमध्ये प्रवेश घ्यावा लागला याची चौकशी करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.