कल्याण : कल्याण डोंबिवलीतील वायू प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. कल्याण डोंबिवलीतील हवेची गुणवत्ता खालावली असून एक्यूआय इंडेक्सने 200 ची पातळी ओलांडल्याचे दिसत आहे. त्यामुळे दमा किंवा श्वसनाशी संबंधित आजार असणाऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांकडून केले जात आहे.
कल्याण डोंबिवली शहरात लोकसंख्येप्रमाणेच वाहनांची संख्याही लक्षणीय आहे. पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेले खड्डे अद्यापही पूर्णपणे भरण्यात आलेले नाही . त्यामुळे नागरिकांनी धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे धुळीचा त्रास तर दुसरीकडे वाहनांचे प्रदूषण याचा परिणाम थेट हवेच्या गुणवत्तेवर झाला असून कल्याणात 202 तर डोंबिवली परिसरात एक्युआयची पातळी त्यापेक्षा अधिक म्हणजे तब्बल 250 वर पोहोचली आहे. या आकडेवारीवरूनच इथल्या वायू प्रदुषणाचा अंदाज येऊ शकतो.
पीएम10 आणि पीएम2.5 हे घटक प्रदूषण वाढीस जबाबदार...
ज्यातही पीएम10 आणि पीएम 2.5 हे दोन घटक वायू प्रदूषण वाढवण्यास जबाबदार ठरले आहेत. धूळ आणि गाड्यांचे प्रदूषण यामुळे हे दोन्ही घटक वाढण्यास कारणीभूत ठरतात. पीएम10 म्हणजे 10 मायक्रोमीटरपेक्षा सूक्ष्म कण आणि पीएम2.5 म्हणजे अडीच मायक्रो मीटरपेक्षा छोटे असे अतिसूक्ष्म कण आहेत . हे अतिसूक्ष्म धूलीकण श्वसनाद्वारे आपल्या श्वसन नलिकांत जाऊन बसतात आणि त्यामुळे मग आपल्याला सर्दी, खोकला किंवा इतर श्वसनाचे आजार जडतात अशी माहिती वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ मंडळींकडून देण्यात आली.
वाढत्या प्रदुषणाचा सर्वानीच काळजी घ्या - डॉ. गुरुदत्त भट, बालरोग तज्ञ
कल्याण डोंबिवलीतील वाढत्या प्रदूषणाचा त्रास लहान मुलांसह प्रौढ नागरिक आणि ज्येष्ठांनाही जाणवत आहे. इतक्या मोठ्या वायू प्रदूषण पातळीमुळे सर्दी, खोकला, दम्याचे त्रास अशा आजारांचे रुग्ण वाढले आहेत. त्यासाठी मास्क वापरणे हा कायमस्वरुपी उपाय नसला तरी मास्कमुळे काही प्रमाणात हे धुलीकण आपल्या शरीरात जाण्यास मज्जाव होत आहे, अशी माहिती सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. गुरुदत्त भट यांनी दिली.