पर्यटन पुरस्कारात महाराष्ट्राची बाजी!

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान

    28-Sep-2022
Total Views |
Tourism
 
 
मुंबई : महाराष्ट्राने पर्यटन क्षेत्रात बाजी मारली आहे. सर्वोत्कृष्ट राज्याचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार सोमवारी दि. २७ सप्टेंबर रोजी राज्याला प्रदान करण्यात आला. यासह विविध श्रेणीतील एकूण नाऊ पुरस्कार राज्याला आज प्रदान करण्यात आले. नवी दिल्लीच्या विज्ञान भवनात जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने वर्ष २०१८ -१९ चे ‘राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. याप्रसंगी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी, केंद्रीय पर्यटन राज्य मंत्री अजय भट, केंद्रीय पर्यटन सचिव अरविंद सिंह, अतिरीक्त सचिव राकेश वर्मा मंचावर उपस्थित होते.
 
  
यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते प्रमुख ११ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तर उर्वरित पुरस्कारांचे वितरण केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांच्या करण्यात आले. महाराष्ट्राला सर्वोकृष्ट राज्यासाठीचा सर्वंकष पर्यटन विकासाचा द्वितीय क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला असून पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यावतीने हा पुरस्कार स्वीकारला.
 
 
पर्यटन क्षेत्रातील विविध सेवा सुविधा पुरविणाऱ्या शासकीय संस्थांसोबतच खाजगी सेवा पुरविणा-या संस्थांनाही राष्ट्रीय पर्यटन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्येही महाराष्ट्राने मोहर उमटविली आहे. पर्यटकांना उत्कृष्ट नागरी सुविधा पुरविल्याबद्दल सातारा जिल्ह्यातील पाचगणी नगर परिषदेला राष्ट्रीय पर्यटन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सातारा जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी आणि पाचगणी चे मुख्याधिकारी गिरीष दापकेकर यांनी स्वीकारला. मुंबईतील ताजमहाल पॅलेस या पंचतारांकीत डिलक्स हॉटेलला ‘पंचतारांकीत हॉटेल’ श्रेणीतील चांगल्या सुविधा पुरविण्यासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पश्चिम विभागातील उत्कृष्ट निरोगता (वेलनेस) केंद्र या श्रेणीतील पुरस्कार पुण्यातील आत्मंतन वेलनेस, मुळशी (पुणे) यांना प्रदान करण्यात आला. ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठीच्या श्रेणीतील पुरस्कार चंदन भडसावळे यांना सगुनणाबाग (नेरळ) येथे सुरू केलेल्या ग्रामीण पर्यटन केंद्राला प्रदान करण्यात आला.
 
 
द वेस्टर्न रूट्स या ट्रॅव्हल कंपनीला जबाबदार पर्यटन प्रकल्पांतर्गत उत्कृष्ट सेवा प्रदान करण्यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला हा पुरस्कार परांजपे यांनी स्वीकारला. पर्यटक वाहतूक परीचालक श्रेणी –2 मधील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मुंबईतील गीती ट्रॅव्हल्स यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मनमोहन गोयल यांनी स्वीकारला. पर्यटक परिवहन संचालक श्रेणी – 1 मधील द्वितीय क्रमांचा पुरस्कार ओरिक्स ऑटो इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस मर्यादित यांना प्रदान करण्यात आला. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाद्वारे परवानाप्राप्त अतुल्य भारत बेड एंड ब्रेकफास्ट (गोल्डन आणि सिल्वर) या श्रेणींतर्गत पाचगणी येथील डाला रूस्टर, होमस्टे यांना उत्कृष्ट सेवा पुरविल्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार कॅप्टन विकास गोखले आणि श्रीमती गोखले यांनी स्वीकारला.
 
 
महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब
राष्ट्रीय पर्यटन पुरस्कारात महाराष्ट्राने मारलेली बाजी अतिशय अभिमानाची आहे. महाराष्ट्रात पर्यटनासाठी अनेक ठिकाणे आहेत. जुन्या पर्यटन स्थळाबरोबरच नवीन स्थळांचा ही विकास केला जाणार आहे, अशी प्रतिक्रिया पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राला मिळालेले यश अतिशय कौतुकास्पद आहे. या पुरस्काराने राज्यातील पर्यटनाच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्वांना प्रेरणा मिळणार आहे. पर्यटनाच्या क्षेत्रातील सर्व घटकांना एकत्र घेऊन राज्याचा पर्यटन विकासासाठी शासनाच्या वतीने प्रयत्न केले जातील. पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, शाश्वत आणि पर्यावरण पूरक पर्यटनास चालना देण्यासाठी विशेष कृती आराखडा आखण्यात येत आहे.
“  या पुरस्काराने आम्हाला आगामी काळात पर्यटन विकासाच्या कार्यास प्रेरणा व उर्जा मिळणार आहे. वैविध्यपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण पर्यटन स्थळे, वाहतूकीचे विकसित जाळे, निवासाच्या दर्जेदार सुविधा आणि अनुभवजन्य पर्यटनाच्या आधारावर आगामी काळात औद्योगिक क्षेत्रातील आघाडी प्रमाणेच पर्यटन क्षेत्रातही महाराष्ट्र आघाडीवर राहील. शाश्वत पर्यटन, सुरक्षित पर्यटन व अनुभवजन्य पर्यटन या त्रिसूत्रीवर आधारीत पर्यटन विकासाचे मॉडेल आगामी काळात महाराष्ट्रात उभारले जाईल -डॉ. धनंजय सावळकर,  सहसंचालक ,पर्यटन संचालनालय