आदित्य ठाकरेंच्या वरळीत मराठी शाळा हरवली!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jun-2022   
Total Views |

AT
 
 
 
 
 
मुंबई : मुंबईचे रहिवासी आणि वरळीचे आमदार असलेल्या आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात मराठी शाळा हरवल्याचा आरोप वरळीतील स्थानिक रहिवाशांनी केला आहे. मागील काही वर्षांपासून आम्ही मोठ्या समस्यांना तोंड देत असून, अनेक सुविधांपासून आम्ही वंचित राहिल्याची खंतही वरळीकरांनी व्यक्त केली आहे. पोलीस वसाहत भागात काही वर्षांपूर्वी एका शाळेच्या उभारणीसाठी तत्कालीन पोलीस आयुक्त आणि इतर महत्त्वपूर्ण व्यक्तींच्या उपस्थितीत बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. मात्र, अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतरही त्याठिकाणी शाळेचा लवलेशही नसल्याचा दावा स्थानिकांनी केला असून आदित्य ठाकरेंच्या वरळीतील आमच्या मुलांची हक्काची शाळा हरवली असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात स्थानिकांनी नुकताच दै. ‘मुंबई तरुण भारत’शी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
 
 
 
गायब झालेली शाळा बांधली जावी
 
काही वर्षांपूर्वी या भागात शाळेच्या उभारणीसाठी भूमिपूजन झाले होते आणि आम्हीही आमच्या भागात शाळा होणार यामुळे आनंदी होतो. जिथे आम्ही शिकलो त्याच भागात आमची मुले शिकणार, याचा आम्हाला आनंद होता. पण, इतकी वर्षे उलटली तरी, त्या शाळेचा काही थांगपत्ता नाही. या भागात शाळा नसल्यामुळे आमच्या मुलांना दादर किंवा लांबच्या ठिकाणी शाळेला जावे लागते, जे खूप त्रासदायक आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक म्हणून आमची एकच अपेक्षा आहे, ती म्हणजे या भागातील शाळा जी गायब झाली आहे, ती या ठिकाणी बांधली जावी.
- कविता सुपुगडे, स्थानिक रहिवासी, वरळी पोलीस वसाहत
 
 
 
खुल्या चर्चेला तयार!
 
वरळीत शाळा गायब झाली, असा आरोप लगावला जात असला तरी त्यात काही तथ्य नाही. आरोप करणार्‍या व्यक्तींशी आम्ही समोरासमोर खुली चर्चा करायला तयार असून यावर चर्चा करण्याची आमची तयारी आहे.
- आशिष चेंबूरकर, माजी नगरसेवक, शिवसेना
 
 
 
वरळीत ३ आमदार तरी मराठी शाळा दुर्लक्षित
 
वरळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणवला जातो. एकट्या वरळीत शिवसेनेचे तीन आमदार आहेत. याच मतदारसंघातील नगरसेविका मुंबईच्या माजी महापौरदेखील आहेत. मात्र, इतकी मोठी राजकीय ताकद असूनही मराठी शाळा आणि मराठी माणसाच्या नावाने राजकारण करणार्‍या शिवसेनेच्या या मतदारसंघात मराठी शाळा मात्र पूर्णतः दुर्लक्षित आहे, हे वास्तव आहे. त्यामुळे शिवसेनेच्या मराठी विषयक भूमिकेवर आता स्पष्टपणे प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे.
- दीपक सावंत, जिल्हा सरचिटणीस, दक्षिण मुंबई भाजप
 
 
 
राजकीय दबाव आहे का?
 
मुंबई महापालिका मागील २५ वर्षांपासून शिक्षण विभागावर हजारो कोटींचा निधी खर्च करत आलेली आहे. मात्र, मूलभूत शिक्षण सुविधांमध्ये कुठलाही फरक पडलेला नाही. केवळ टॅब किंवा ‘डिजिटल’ शिक्षणाच्या घोषणा करण्यात रममाण होणार्‍या युवा नेतृत्वाने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. ‘ए प्लस’ वरळीचे स्वप्न दाखवणार्‍या आमदारांनी वरळीत एकतरी शाळा बांधून दाखवावी. जर अशाप्रकारे शाळा गायब होत असतील, तर त्यामागे कुणाचा राजकीय दबाव आहे का? आणि तो असेल, तर येत्या काळात या जागेवर दुसरीच इमारत बांधली जाणार का, हा खरा प्रश्न आहे.
- दीपक पाटील, अध्यक्ष, वरळी विधानसभा, भाजप
 
 
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@