पुणे : ठाकरे सरकारच्या निष्क्रीयपणा आणि इच्छाशक्तीचा अभाव यामुळे पुण्यातील MPSC स्पर्धा परिक्षेची तयारी करणारा विद्यार्थी स्वप्नील लोणकर याने आत्महत्या केली आहे. पूर्व आणि मुख्य परीक्षा झाल्यानंतरही मुलाखत न झाल्याने त्याने हे पाऊल उचलल्याचे आपल्या आत्महत्येपूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. सोबतच ही बाब इतरांपर्यंतही पोहोचवा इतर मुलांची वर्षे यामुळे वाया जाणार नाहीत, असेही तो म्हणाले आहे. नेमकं त्यानं आपल्या चिठ्ठीत काय म्हटलं जाणून घ्या...""
MPSC हा मायाजाल आहे त्यात पडू नका!, MPSC स्पर्धा परीक्षेच्या वेळापत्रकावरही त्यानं भाष्य केले आहे. त्यात तो म्हणतो. "MPSC वर्ष २०१९ ची जाहीरात निघाली एप्रिल २०१९ रोजी होणारी पूर्व परीक्षा रद्द झाली. मुख्य परीक्षा नोव्हेंबर २०१९ रोजी होणार होती ती देखील रद्द झाली. मुलाखत ही दीड वर्षापासून प्रलंबित आहे. MPSC वर्ष २०२० ची मार्च महिन्यात होणारी प्रलंबित परीक्षा रद्द झाली. मुख्य परीक्षा प्रलंबितच," हा घटनाक्रम स्वप्नीलने आपल्या मृत्युपूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीत लिहीला.
तो म्हणतो, "येणाऱ्या प्रत्येक दिवसात वय आणि ओझं वाढत जातं. आत्मविश्वास तळाला पोहोचतो. स्वतःच्या कतृत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होते. दोन वर्षे झालीत पास होऊन आणि वय २४ संपत आले आहे. घरची एकंदरीत परिस्थिती, परीक्षा निघणार या आशेवर घेतलेले कर्ज, खासगी नोकरी करून कधीही न फिटू शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या वाढत्या अपेक्षा आणि प्रत्येकवेळी कमी पडत असणारा मी, ही भावना..."
"कोरोना नसता आणि सर्व परीक्षा सुरळीत झाल्या असत्या, तर आज आयुष्य खूप वेगळं असलं असतं. चांगलं झालं असतं, हवं ते ठरवलं असतं, मी घाबरलो, खचलो मूळीच नाहीये, फक्त मी कमी पडलो माझ्याकडे वेळ नव्हता!. नकारात्मकतेची ही वादळं कित्येक दिवस मनात होती, पण काहीतरी चांगलं होईल, या आशेवर तग धरला होता. पण इथून पुढे सुरळीत सुरू राहील, असं काहीच घडणार नाही. या प्रकाराला कुणी कारणीभूत नसून हा सर्वस्वी माझा निर्णय आहे. शंभर जीव वाचवायचे होते पण मला डोनेशन करून ७२ राहीलेत. जमलं तर हे इतरांपर्यंत पोहोचवा, अनेक जीव वाचतील." - स्वप्नील लोणकर
ठाकरे सरकारच्या निष्क्रीयपणाचा बळी!
"खरंतर ही व्यथीत करणारी बातमी आहे. MPSC मुख्य परीक्षा पास होऊनही मुलाखतीची वाट पाहणाऱ्या आपल्या स्वप्नील लोणकर या मित्रानं आत्महत्या केली. हे टोकाचं पाऊल स्वप्नीलला का उचलावं लागलं? यासाठी सर्वस्वी महाविकास आघाडी सरकारचा नाकर्तेपणा जबाबदार नाही का?, अशा अनेकांच्या मुलाखती व नियुक्त्या बाकी आहेत. पण माझी सर्व एमपीएससी करणाऱ्या मित्रांना- बंधूंना विनंती आहे, आपण कोणतही टोकाचं पाऊल उचलू नका. आपलं आयुष्य अमुल्य आहे. हा लढा आपण एकत्र लढू... स्वप्नीलच्या आत्म्यास शांती मिळो. भावपूर्ण श्रद्धांजली
- गोपीचंद पडळकर, भाजप आमदार
राज्यातील युवा, शेतकरी, कलाकार हे निराशेने आत्महत्याचा मार्गावर असताना ठाकरे सरकार काय करतय तर बिल्डरांना सवलती देत आहे. चार घटना त्यात एकाच दिवशी तीन आत्महत्या, पहीली प्रशासनाच्या अनास्थेमुळे लोहा नांदेड येथील दिव्यांग शेतकऱ्याची आत्महत्या, दुसरी एमपीएसीतील विलंबामुळे स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याची आत्महत्या, तिसरी कला दिग्दर्शक राजेश साप्ते यांची आत्महत्या, मात्र राज्य सरकारची प्राथमिकता काय तर बीडीडी चाळ प्रकल्पाची एकही वीट लावली नसताना बिल्डर्सना ५०० कोटी रूपये देण्याचा प्रस्ताव.
- केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ते भाजप
